दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी- मोहन आखाडे
औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करणे ते सुद्धा मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत तसेच विकास मंडळांचे पुनर्गठण करणे हे महाविकास आघाडी सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण आहे. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याचे श्रेय शिवसेनेने लाटू नये. केंद्र सरकारच ‘संभाजीनगर’ या नावा वर शिक्कामोर्तब करणार आहे, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी रविवारी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
डॉ. कराड म्हणाले की, ‘हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून पक्षात फूट पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत जाता जाता औरंगाबाद शहराचे संभाजीनगर नामकरण करण्याचा तसेच मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र या विकास मंडळांचे पुनर्गठण करण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीला हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. 39 आमदार फुटल्यानंतर आता सरकार वाचणार नाही हे लक्षात आल्यानंतरच ‘संभाजीनगर’चा निर्णय घेण्यात आला.
आम्ही या निर्णयाचे स्वागतच करतो.’औरंगाबादचे नामांतर करण्याच्या राज्याच्या प्रस्तावावरील कायदेशीर बाबींची नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पूर्तता करतील. त्यानंतर केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव पाठविला जाईल. कोणत्याही शहराचे नाव बदलण्याचे अधिकार केंद्र सरकारचे असतात. राज्याकडून प्रस्ताव आल्यानंतर तो तातडीने मंजूर करून घेण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असून, शिवसेनेने ‘संभाजीनगर’चे श्रेय लाटू नये, असा टोला डॉ. कराड यांनी लगावला.