दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी-दत्तात्रय वा.कराळे
परभणी जिल्ह्यातील पूर्णा जंक्शन शहरालगतच्या रेल्वे पूलाखालील मार्ग मोठ्या प्रमाणात जलमय झाला आहे. परिणामी वाहने, विशेषतः दुचाकी स्वारांना रहदारी करताना आपला जीव मुठीत धरुन प्रवास करणे भाग पडत आहे. मागील चार दिवसांपासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे पूर्णेहून नांदेड व अकोला या दोन्ही मार्गावरील सबवे मार्ग मोठ्या प्रमाणात जलमय होऊनही रेल्वे, तहसील, नगरपरिषद प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मात्र पूर्णपणे डोळेझाक केली जात आहे. सदर बाब अत्यंत खेदजनक व चिंताजनक असूनही नेतृत्वहीन राजकारणी मंडळी सुध्दा जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.
अत्यंत खेदजनक व चीड आणणारी बाब म्हणजे मागील कित्येक वर्षांपासून कासवाच्या गतीने चालू असलेले लगतच्या अंतरावरील रेल्वे उड्डाण पूलाचे खोळंबलेले हे बांधकाम तिन्ही प्रशासनाला तर दिसतच नाही आहे परंतु नांदेड, परभणी जिल्ह्यांचे पालकत्व घेतलेल्या महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही मंत्र्यांना सुध्दा कधीच दिसले नाही किंवा ह्या जिल्ह्यांच्या खासदारांनीही खोळंबलेल्या या बांधकामाविरोधात आवाज उठवून कधी तीव्र आंदोलन छेडले नाही जेणेकरुन झोपलेल्या दिल्लीश्वरांचे लक्ष इकडे वेधले जाणे आवश्यक
होते यापेक्षा दुर्दैव ते कोणते असा संतापजनक सवालही जनता विचारीत आहे.
एके काळी परभणी जिल्ह्याची शान ठरलेले हेच पूर्णा जंक्शन कॉंग्रेसी राजवटीत केंद्रीय मंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांनी येथे कार्यरत असलेले रेल्वेचे वर्कशॉप व त्याला पूरक असे सर्व विभाग.
नांदेडला हलवून नांदेड जिल्ह्याचे महत्व वाढविले आणि पूर्णा जंक्शन शहरासह परभणी जिल्ह्यालाच विकासापासून पूर्णपणे वंचित विशेषतः भकास करुन टाकले असे म्हटले तर वावगे ठरू नये. त्यानंतरही त्यांचे सुपुत्र व राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सुध्दा उरले सुरले सर्वकाही हलवून पूर्णा शहराला विकासात्मक रेल्वे विभागांपासून पूर्णपणे भकास करुन सोडले हे मुळीच नाकारता येणार नाही.
राज्यात पुन्हा शिवसेना -भाजपा युतीचे सरकार स्थानापन्न झाले आहे. तथापि ते अद्याप कायद्याच्या कचाट्यातून स्थीर स्थावर झाले नसल्याने त्यांना सध्या तरी या विषयाकडे लक्ष देण्यास वेळ मिळणार नसला तरी भविष्यात आणि लवकरात लवकर पूर्णेच्या या प्रलंबित रेल्वे उड्डाण पूलाच्या बांधकामांकडे लक्ष देऊन ते पूर्णत्वास नेण्यासाठी लक्ष घालणे आणि संबंधित विभागाला तसे निर्देश देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे शिवाय केंद्र सरकारचेही लक्ष वेधून तसे आदेश देण्यास भाग पाडणे गरजेचे ठरणार आहे.
विकासाभिमुख व कर्मठ म्हणून ज्यांचा बोलबाला आहे असे राज्याला आता एकनाथ शिंदे यांच्या रुपाने मुख्यमंत्री लाभले आहेत. उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची त्यांना मिळालेली साथ कल्पक ठरणार आहे. उभय नेत्यांनी या प्रलंबित कामात तातडीने लक्ष घालून ते पूर्णत्वास नेण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणे अत्यंत गरजेचे ठरणार आहे. तसे झाल्यास पूर्णा शहराची व संबंध परभणी जिल्ह्यातील जनता त्यांना डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहाणारे नाही एवढे नक्की !
दरम्यान पूर्णेच्या या दोन्ही सबवेवर साचलेल्या पाण्यामुळे व नागरिकांना रहदारी साठी होणार्या भयानक त्रासाविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाने सर्वप्रथम आवाज उठवून तसेच झोपलेल्या प्रशासकीय व्यवस्थेला जागं करण्याचं काम करुन जनतेला दिलासा मिळावा यासाठीचे केलेले प्रयत्न कौतुकास्पद असेच म्हणावे लागतील एवढे मात्र खरे !