दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
स्वामींचा आशिर्वाद असल्यावर अन हदयस्थ सदगुरुंचे कृपाछत्र डोईवर असताना माझ्या साहित्याची ” वाटचाल ” आता बिनभिंतीच्या शाळेमधून सुरु झाली आहे. बिनाभिंतीची शाळा आपल्याला आयुष्यात किती नवनवीन प्रगल्भ असे धडे शिकविते ना ! मला याचं खूप कौतुक वाटतं अन का वाटू नये बरं ? पत्निच्या वियोगानंतर आता जगण्यात राम राहीला नाही, ते एकलकोंडं जीवन अगदी नीरस झालेलं असताना, असे हतबल होऊ नका आजपासून लेखणी हाती धरून रोज काहीतरी लिहीत चला. तुमचा साहित्य प्रवास भविष्यात लौकिक पात्र होईल अन या लेखन प्रवासाची वाटचाल स्वामी तुम्हांला नक्कीच यशाच्या शिखरावर नेऊन पोचवतील. त्यांचं बोट धरून चालल्यावर अशक्य ते ही शक्य होते यावर विश्वास ठेवा अन तुमची अनेक पुस्तके प्रकाशित होतील, हीच त्या धुनीतील एक ठिणगी माझं आयुष्य प्रज्वलित करीत आहे अन यापुढेही कविता, कथा, लेख लिहिण्याची वाटचाल मला सुरुच ठेवायची आहे,………. त्यामुळेच मला बिनभिंतीची शाळा आयुष्यात गवसली.
माझ्या घराच्या अगदी जवळच असलेला अथांग समुद्र, त्याच्या फेसाळणाऱ्या लाटा, किनाऱ्यालगतची मऊशार पुळण, बाजूबाजूने घनदाट उंचच उंच उभे असलेले सुरुचे वृक्ष, त्यांच्या छायेखाली फोफावणारी केतकीची बने, सायंकाळी अस्तांचली जाणारा सूर्य, नजरेचे पारणे फेडणारे क्षितिजाला टेकणारे अबोली नारिंगी रवी बिंब, समुद्रावरून वहात येणारे मंद तर कधी धुंद शीतल वारे ! त्याहून आनंददायक म्हणजे मला माझ्याच फ्रेंच विंडोतून खुणावणारा निसर्ग – खंड्या, भारद्वाज, साळुंख्या, पाणकोंबड्या, पाकोळ्या, घिरट्या घालणाऱ्या असंख्य घारी, बगळे, पाणकावळे, चिमण्या, कावळे, कबूतरे, दूर दूररून येणारा मोरांचा आवाज ( केकारव ), नारळ पोफळीची तालेवार झाडे तालत, लयीत डुलताना दिसणे. बांबूच्या बेटातून येणारा शीळ घातल्या सारखा आवाज, नभाकडे पहात असताना थोड्या थोड्या वेळाने आकार बदलणारे तेच ढग, रात्र झाल्यावर नभांगणांत एक एक करत दिवा लावल्या सारख्या प्रकट होणाऱ्या चांदण्या, समोरच्या डोंगरात अंधारात चमचमणारे काजवे, झाडांच्या दाटीवाटीतून तिष्ठत राहिलेले ढग अन वाऱ्यासंगे पडणाऱ्या पावसाच्या रेशीमधारा ………. किती किती अन कितीतरी….. निसर्गाच्या अशा दर्शनातून अनुभवातून मला ज्ञान देतो, धडे शिकवतो, प्रेरणा देतो अन लिहिण्यास प्रवृत्त करत असतो ………. तीच माझी ही बिन भिंतीची शाळा !
लेखन साहित्याची वाटचाल करत असताना ” वाटचाल ” या माझ्या लेखन संग्रहाला माझ्या हृददयस्थ सदगुरुंनी शुभाशिर्वादाचे दोन शब्द गीरनारीदास श्रीराम कर्ता या रूपात पाठविले, ते दोन शब्द मला लाखमोलाच्या कृपा प्रसादा सारखेच आहेत अन त्यांची अशीच कृपा मजवर बरसत राहो ! माझा लाडका पुतण्या सलील चिटणीस एका मोठ्या आय टी कंपनीत चांगल्या जबाबदार पोस्टवर काम करतो, तो व्यस्त असुनही माझ्या या पुस्तकाला प्रस्तावना लिहिण्याचे स्विकारुन एक छान प्रस्तावना त्यानी लिहीली त्याचा मला मनोमन आनंद आहे.
शेवटी मला माझ्याच एका कवितेतील काही ओळी इथे उद्घृत कराव्याशा वाटतात त्या अशा ……….
जपली नाती विरले धागे विश्वास मनी कायम राखला
सरते शेवटी कोण कुणाचे त्या ऋणातुन मुक्त व्हावे
ऋणाऋणांच्या ओझ्याखाली मन कसे दडपून गेले
मुक्त त्यातुन होणेसाठी त्या ऋणातुनही मुक्त व्हावे !
सुप्त कोषातुन जन्मण्या, धाग्यात गुरफटावं लागतं
प्रतिभा फुलून येणेसाठी, मस्तक चरणी झुकावं लागतं !
” वाटचाल ” हे माझे पाचवे पुस्तक, लिहीण्याची उर्मी अजुन बाळसं धरून आहे. बळ आहे जोवर अन आशिर्वाद आहे तोवर लिहीत रहावे, लिहीत रहावे हे मी मनोमन ठरवले आहे. रसिक वाचक म्हणून मला तुमच्याही आशिर्वादाची, सदिच्छांची आस आहे .
सुनील शरद चिटणीस
श्रीवर्धन – रायगड
मो. 79721 60395