दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नागपूर : राज्यात नव्याने स्थापन झालेले शिंदे सेना आणि भाजपचे सरकार अद्याप अस्तित्वात आले नाही. १६ आमदारांवर अपात्रतेची तलवार असताना निर्णय घेणे आणि मंत्रिमंडळाची स्थापना करणे घटनाबाह्य आणि घटनाद्रोही असल्याची टीका शिवसेनेचे खासदार व राष्ट्रीय प्रवक्ते संजय राऊत यांनी केली.
रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल शिंदे गटात गेल्याने येथील पडझड रोखण्यासाठी संजय राऊत नागपुरात आल्याचे बोलले जात आहे.
आज जे काही सुरू आहे तो भास आहे. तात्पुरता आहे. शिवसेना अशा अनेक संकटातून बाहेर आलेली आहे. शिवसेना विदर्भात मोठ्या प्रमाणात काम करीत आहे. शहर आणि ग्रामीण भागात चांगले काम सुरू आहे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदे गटाच्या बंडाने महाआघाडीचे सरकार कोसळल्यानंतर खासदार संजय राऊत प्रथमच नागपुरात आले. दोन दिवसांसाठी नागपूर दौऱ्यावर आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी विमानतळावर संवाद साधला. आधी मी मुख्यमंत्र्यांच्या शहरात येत होतो. आज मी उपमुख्यमंत्र्यांच्या शहरात आलो, असे आठवणही संजय राऊत यांनी करून दिली.
संजय राऊत यांनी आपण वारंवार नागपूरला येणार असल्याचे मागे जाहीर केले होते. मात्र, त्यावेळी शिवसेना एकजूट होती. भाजपला पराभूत करण्यासाठी आघाडीने पुढील निवडणुका एकत्रितपणे लढाव्या यावर सर्व नेत्यांचे एकमत होते. आता शिवसेना फुटली आहे. आता त्यांना आपले सहकारी फुटू नये याची अधिक काळजी घेण्याची गरज आहे.