दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवा डाव खेळून पाहिला होता. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी डिलिंगचा प्रयत्नही केला.
एवढेच नव्हे, तर उद्धव ठाकरे यांनी सत्ता वाचविण्याचा अखेरचा प्रयत्न म्हणून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही संपर्क साधला होता. मात्र, कुणीही त्यांना अपेक्षित प्रतिसाद दिला नाही आणि अखेर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले, अशी नवी माहिती आता समोर आली आहे. ‘इंडिया टुडे’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सरकार स्थापन करण्यासाठी देवेंद्र फडणवीस वेशांतर करून एकनाथ शिंदे यांना भेटत असत. दोन्ही नेते मध्यरात्री भेटत, अशी माहिती यापूर्वी समोर आली होती. ‘इंडिया टुडे’नेही याबाबत वृत्त दिले आहे. त्यानुसार एकनाथ शिंदे यांनी 26 आमदारांना घेऊन सुरत गाठल्याचे स्पष्ट होताच उद्धव ठाकरे यांनी हालचाली सुरू केल्या. ठाकरे यांनी उर्वरित आमदारांना स्वत:च्या बाजूने ठेवण्याचा प्रयत्न केला. सुरतेतील आमदारांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू केले. लगोलग सुरतमधील आमदारांना गुवाहाटीला पाठविण्यात आले. त्यामुळे कुणाचेही मन वळविण्यात ठाकरेंना यश आले नाही. उलट उरलेसुरले सोबत असलेले आमदारही शिंदे गोटात दाखल होऊ लागले. त्यामुळे ठाकरे पुरते हतबल झाल्याचेही या वृत्तात म्हटले आहे.