दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या अनेक आमदारांना आपल्यातकडे वळवल्यानंतर आता 12 खासदारांना आपल्या गटात सहभागी करुन घेतलं आहे. शिवसेनेच्या 12 खासदारांचा गट एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाला आहे.
शिंदे गटाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मान्यता मिळावी यासाठी राजधानी दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे.
एकनाथ शिंदे स्वत: दिल्लीला गेले आहेत. या दरम्यान मुंबई शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अनेक कार्यकर्ते, सामाजिक संघटनांसोबत बैठका घेत आहेत. शिवसेनेला पुन्हा नवसंजीवनी देण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.
विशेष म्हणजे शिवसेनेत पडलेल्या फुटीला बंडखोर आमदार नाही, तर भाजप जबाबदार असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तसेच तुम्ही माझ्या भात्यातील कितीही बाण न्या. पण धनुष्य मात्र माझ्याकडेच आहे, हे लक्षात ठेवा, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला आहे. उत्तर भारतीय महासंघाच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेना भवन येथे येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
या पदाधिकाऱ्यांनी आपण शिवसेनेसोबत असल्याची भावना व्यक्त केली. या पदाधिकाऱ्यांसोबत सुरु असलेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. “तुम्ही माझ्या भात्यातील कितीही बाण न्या. पण धनुष्य मात्र माझ्याकडेच आहे, हे लक्षात ठेवा.
शिवसेनेमध्ये फूट बंडखोर आमदारांनी नाही तर भाजपने पाडली. भाजपच शिवसेना संपवत आहे. भाजप दोन कोंबड्यांमध्ये झुंज लावत आहे. यातील एक कोंबडा मेला की दुसऱ्या कोंबड्याला ते जेलमध्ये टाकतील”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
(‘त्या’ कामासाठी 10 वर्षापूर्वीच सेना -राष्ट्रवादी एकत्र येणार होते पण.., शिवसेनेच्या माजी खासदाराचा गौप्यस्फोट) दरम्यान, महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप झाल्यानंतर आता दिल्लीतही घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेच्या 12 खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. शिंदेची भेट घेतलेल्या या खासदारांमध्ये श्रीकांत शिंदे, भावना गवळी, हेमंत गोडसे, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, श्रीरंग बारणे यांच्यासह 12 खासदारांचा समावेश आहे. एकनाथ शिंदे यांना भेटण्याआधी या बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं. या पत्रात राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वातील 12 खासदारांच्या गटाला मान्यता देण्याची मागणी करण्यात आली. लोकसभेच्या शिवसेना संसदीय पक्षाच्या नेतेपदी राहुल शेवाळे आणि प्रतोद पदी भावना गवळी यांची नियुक्ती केल्याचे पत्र देण्यात आले. भावना गवळी या शिंदे गटाच्या मुख्य प्रतोद म्हणून कायम असल्याचं म्हटलं आहे.
पण शिवसेनेनं आधीच भावना गवळी यांची हकालपट्टी केली आहे. लोकसभा सचिवालयाने मात्र या पत्रात काही बदल सुचवले. मुख्य प्रतोद यांच्या नावानेच पत्र द्या असं शिंदे गटाला लोकसभा सचिवालयाकडून सांगण्यात आलं शिंदे गटाच्या काल झालेल्या बैठकीला या 12 खासदारांनी ऑनलाईन उपस्थिती लावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये सदाशिव लोखंडे, हेमंत गोडसे, हेमंत पाटील, राजेंद्र गावित, संजय मंडलिक, श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, राहुल शेवाळे, प्रतापराव जाधव, धैर्यशील माने, कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांचा समावेश होता. तसेच शिवसेनेच्या या 12 खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळात दोन खाती मिळण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगामी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिंदे गटातल्या एका खासदाराला केंद्रीय मंत्रीपद तर आणखी एकाला राज्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं