दैनिक चालु वार्ता संपादक : डि. एस. लोखंडे पाटील
नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत अखेर एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या आहेत.
तिसऱ्या फेरी अखेर मुर्मू यांना 812, तर यशवंत सिन्हा यांना 512 मते मिळाली. राष्ट्रपती निवडणुकीसाठी 18 जुलैला मतदान घेण्यात आले होते. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपणार आहे. देशाच्या नव्या राष्ट्रपती 25 जुलै रोजी शपथ घेतील.
द्रौपदी मुर्मू 2015-2021 दरम्यान झारखंडच्या राज्यपाल राहिल्या आहेत. 20 जून 1958 रोजी ओरिसामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे शालेय शिक्षण भुवनेश्वरच्या रमादेवी महिला महाविद्यालयातून झाले. प्राथमिक शिक्षण मूळ जिल्ह्यातून पूर्ण केल्यानंतर भुवनेश्वरमधील रमादेवी महिला महाविद्यालयातून त्यांनी पदवी प्राप्त केली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी शिक्षक म्हणून करिअरला सुरुवात केली आणि काही काळ या क्षेत्रात काम केले.
नगरसेवक पदापासून सुरुवात
शिक्षिका म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या मुर्मूंनी 1997 मध्ये नगरसेवक होऊन राजकारणात प्रवेश केला. तीन वर्षांनी 2000 मध्ये त्या पहिल्यांदा आमदार झाल्या. यादरम्यान, त्या राज्यातील भाजप-बीजेडी सरकारमध्ये दोन वेळा मंत्रीही होत्या. मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्या राज्यपालही झाल्या. झारखंडच्या त्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. एवढेच नाही तर देशातील कोणत्याही राज्याच्या राज्यपाल बनणाऱ्या त्या देशातील पहिल्या आदिवासी महिला नेत्या होत्या.
सरकारी नोकरीही केली
द्रौपदी मुर्मू यांनी 1980 मध्ये श्याम चरण मुर्मूंसोबत प्रेमविवाह केला. मुर्मूंना तीन आपत्ये होती, त्यापैकी दोन मुलांचा मृत्यू झाला तर तिसरी मुलगी बँकेत काम करते. द्रौपदी मुर्मू यांनी 1979 ते 1983 या काळात पाटबंधारे आणि विद्युत विभागात कनिष्ठ सहाय्यक म्हणूनही काम केले आहे. 1994 ते 1997 पर्यंत त्यांनी श्री अरबिंदो इंटिग्रल एज्युकेशन सेंटर, रायरंगपूर येथे मानद सहाय्यक शिक्षक म्हणून नोकरी केली.
मुलांच्या मृत्यूने धक्का
एक काळ असा होता की, द्रौपदी मुर्मूंवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. 2009 मध्ये द्रौपदी मुर्मूंच्या मोठ्या मुलाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्यावेळी त्यांचा मुलगा फक्त 25 वर्षांचा होता. हा धक्का सहन करणे आई म्हणून खूप कठीण होते. यानंतर 2013 मध्ये त्यांच्या दुसऱ्या मुलाचाही मृत्यू झाला. त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी पतीलाही गमावले. अशा स्थितीत मुर्मूंनी स्वत:ला आणि मुलीला सांभाळले. दोन्ही मुले आणि त्यानंतर पतीच्या मृत्यूनंतर द्रौपदी मुर्मूंना मोठा धक्का बसला होता. या घटनांमुळे दुखावलेल्या मुर्मींनी पहारपूरमधील घराचे शाळेमध्ये रूपांतर केले. आता या शाळेत मुलांना शिक्षण दिले जाते.