दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून परभणी जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात सुमारे चार लाख “हर घर तिरंगा” फडकावत हा उपक्रम राबविला जाणार असून कोणाकडूनही या उपक्रमाचे उल्लंघन होता कामा नये, तसे झाल्यास तात्काळ कळवावे, जणू असा इशाराच जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिला आहे.
काल झालेल्या पत्रकार परिषदेत विविध अधिका-यांच्या उपस्थितीत बोलताना जिल्हाधिकारी यांनी असेही सांगितले की, शहरी भागात एक लाख तर ग्रामीण भागात तीन लाख तिरंगा उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. दि. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान चालणारा हा उपक्रम संपूर्ण जिल्हाभरातील शासकीय निमशासकीय कार्यालये, महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, विविध सेवा सहकारी कार्यालये व सोसायट्या, खासगी संस्थांची कार्यालये, औद्योगिक संस्था, शाळा, कॉलेज, बालवाड्या, अंगणवाड्यांसह अन्य सर्व प्रकारची कार्यालये, दुकाने, व्यावसायिक व निवास धारकांनी हा उपक्रम राबविणे बंधनकारक आहे. हा उपक्रम अगदी उत्साहपूर्वक आणि यशस्वी होणे महत्वाचे आहे, कोणाकडूनही याचे उल्लंघन होता कामा नये, तसे झाल्यास त्वरीत कळवावे असा इशाराच देऊन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी हा उपक्रम किती महत्त्वपूर्ण आहे, हे निदर्शनास आणून दिले आहे.