दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी- मोहन आखाडे
औरंगाबाद: माजी उपमहापौर आणि युवासेनेच्या जिल्हा सचिवपदी राहिल्यानंतर शिवसेनेतून हकालपट्टी झालेले राजेंद्र जंजाळ यांची एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेतून बाहेरचा रस्ता दाखवला गेल्यानंतर अवघ्या चारच दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जंजाळ यांच्या गळ्यात जिल्हाप्रमुख पदाची माळ घालण्यात आली. विशेष म्हणजे नियुक्ती आणि त्या अनुषंगाने सत्कार केल्यानंतर शिंदे जंजाळ यांच्या कानात काहीतरी पुटपुटल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राज्यात शिवसेना नेतृत्वविरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड पुकारल्यानंतर दहा दिवस राजकीय नाट्य चालले. त्यानंतर सत्तांतर होऊन अखेर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस विराजमान झाले. शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. या बंडात औरंगाबाद जिल्ह्यातील पाच आमदारांचा समावेश होता. या आमदारांसोबत जिल्ह्यातील अनेक कार्यकर्तेही त्यांच्या मागे गेले.
काही दिवसांपूर्वी माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ हे आ. संजय शिरसाट यांच्यासोबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या सत्कारासाठी मुंबईला गेले होते. त्याचवेळी जंजाळ यांची पावले शिंदे गटाकडे पडत असल्याचे संकेत मिळाले होते. त्यातच जंजाळ मुंबईतून परतताच त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. शिवसेनेच्या मुखपत्रातून त्याची बातमी देण्यात आली. त्याच दिवसापासून जंजाळ यांनी शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वविरोधात तोफ डागण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून ते रोजच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि आ. अंबादास दानवे यांच्याविरोधात बोलत होते. त्यांची भाषा आक्रमक होती.
हा सगळा विचार करून जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि त्यांच्या स्थानिक नेत्यांना आक्रमकपणे उत्तर देण्यासाठी जंजाळ हेच जिल्हाप्रमुख म्हणून योग्य ठरू शकतात, असे शिंदे गटाला वाटले असण्याची शक्यता आहे, शिवाय जंजाळ यांच्यामागे आ. शिरसाट उभे असल्याने त्यांनी जंजाळ यांना जिल्हाप्रमुख करण्यात मोठा वाट उचलल्याची चर्चा आहे. दरम्यान, आज जंजाळ यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी शिंदे यांनी जिल्हाप्रमुख म्हणून जंजाळ यांच्या नावाची घोषणा करतानाच त्यांचा सत्कार केला. यावेळी आमदार संजय शिरसाट, आ. दादा भुसे, आ. आशिष जैस्वाल यांची उपस्थिती होती.
कानात मंत्र
जंजाळ यांच्या सत्कारानंतर शिंदे यांनी त्यांच्याशी गप्पाही मारल्या. विशेष म्हणजे हे सारे कॅमेऱ्यासमोर सुरु होते. आता चांगले काम करा, अशी सुरुवात केल्यानंतर शिंदे यांनी या संवादादरम्यान जंजाळ यांच्याजवळ जाऊन त्यांच्या कानात काहीतरी सांगितले. हे चित्रीकरण करणाऱ्यांना ऐकू जाणार नाही याची काळजी घेण्यात आली. त्यानंतरही बराच वेळ अतिशय हळू आवाजात शिंदे जंजाळ यांना काहीतरी सांगत होते. आता शिंदे यांनी जंजाळ यांना काय कानमंत्र दिला, हे पुढील काळात जंजाळ यांच्या वागण्यावरून सगळ्यांना कळण्याची अपेक्ष व्यक्त व्यक्त होत आहे.