दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
देशातील महाराष्ट्रासारख्या या देवभूमीला अनेक रत्न लाभले ज्यांनी संत साहित्याचे कार्य देशपातळीवर नेले जसे की संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांनी पंजाब प्रांतापर्यंत भागवत धर्मांच्या विचारांची पेरणी केली. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी जगातील सर्वश्रेष्ठ ज्ञानग्रंथ ज्ञानेश्वरीचे सर्व सामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत रुपांतर केले व हा ग्रंथ आज जगातील विविध विद्यापीठात ज्ञानार्जनासाठी, अभ्यासासाठी आचरण केला जातो असेच या महाराष्ट्राच्या पावनभूमी संत श्रेष्ठ सावता महाराज यांचा जन्म झाला ज्यांनी आपल्या जीवनकार्यामध्ये लोकजनांना उद्देशून सांगितले की ‘वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी’ म्हणजे परमेश्वर (पांडूरंग) पहायचा असेल तर चांगले कर्म करत राहा तुमच्या कर्मातच देव आहे.
महाराष्ट्राच्या पावन भूमीत संत ज्ञानेश्वर महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत मुक्ताबाई, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत रामदास स्वामी, संत गाडगे महाराज, संत गोरा कुंभार, संत चोखा मेळा, संत नामदेव महाराज, संत कान्होपात्रा, संत गजानन महाराज, संत स्वामी समर्थ, साई बाबा, संत अवजीनाथ महाराज, संत सद्गुरु वामनभाऊ महाराज, राष्ट्र संत भगवानबाबा असे अनेक संत महापुरुष, सिद्धपुरुष, होऊन गेले यापैकीच संतश्रेष्ठ सावता महाराज हे एक होय. सौ.नांगीताबाई व श्री.परसुबा यांच्या पोटी संत सावता महाराज यांचा जन्म झाला.
चंद्रभागेच्या तिरावर उभे असणारे त्रिलोकांचे स्वामी पंढरपुर निवासी भगवान पांडूरंग यांची पालखी अरणला सावता महाराजांच्या भेटीला जाते हा संत परंपरेतील भक्त आणि देव यांचा अलभ्य भेटीचा असा वारसा ज्यांना लाभला असे संतश्रेष्ठ सावतामहाराज यांचा जन्म साधारणतः बाराव्या शतकात पंढरपूर पासून काही अंतरावर असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील आरण या गावी झाला. संत परंपरेचा वारसा चालु ठेवण्यासाठी आपलं संबंध आयुष्य लोककल्याणासाठी समर्पित करणारे संत कवी संतश्रेष्ठ सावता महाराज यांना वारसा हा अध्यात्मिक-धार्मिक कुटूंबियांचा लाभला कारण त्यांचे आजोबा देवू माळी हे पंढरीच्या विठ्ठलाचे भक्त असून नियमित अजीवन वारकरी होते. शेती हाच कुटुंबियांचा, उपजिविकेचा मुख्य प्रपंचिक व्यवसाय असल्याने कुटूंबातील सर्व व्यक्ती ही शेती करत होते. लहानपणापासूनच कुटुुंब अध्यात्मिक असल्याने सावता महाराज यांचे मन विठ्ठलभक्तीमध्ये रमले. फुले, फळे, भाज्या आदी पिके शेतात पिकवण्याचा त्यांचा पारंपारिक व्यवसाय, भौतिक जिवनात कर्तव्य कर्म करित असतांना काया, वाचा मनाने ईश्वरभक्ती करता येते हा अधिकार सर्वांना आहे.
न लगे सायास । न पढे संकट । नामे सोपी वाट वैकुंठाची । असा त्यांचा जीवनप्रवासातील अनुभव होता. जनसामान्यांना आत्मउन्नतीचा मार्ग दाखवत असतांना धार्मिक प्रबोधन, भक्ती प्रसाराचे कार्य त्यांनी निष्ठेने व्रत म्हणून स्वीकारले.
मानवता हाच खरा धर्म समजून लोकांमध्ये त्यांच्या मनातील अंधश्रद्धेचे तन उपटून काढून समाज मनाची मशागत करण्यासाठी समाज जागृती करण्याच्या उद्दात हेतूने संतश्रेष्ठ सावता महाराज यांनी अनेक असे महत्वपुर्ण अभंग चालू परिस्थितीला उद्देशून रचले ज्याचा तात्कालीन समाजमनावर मार्गदर्शनात्मक परिणाम झाला. मनापासून शेती करावी, गाई गुरांना प्रेमाने सांभाळावे, शेतीला पाणी द्यावेे, भरघोस पिके काढावी, अडल्या-नडल्यांना मदत करावी, वंचित पिडीतांना घासातला घास भरवावा ही त्यांची मुळ शिकवण. दिन दुबळ्यांना मदत हीच खरी पांडूरंग भक्ती आहे अशी त्यांची धारणा होती.
अंधश्रद्धा, कर्मठपणा, दांभिकता ह्या समाजविघातक प्रवृत्तीवर प्रहार करतांना त्यांनी कोणाचीही भिडभाड न ठेवता समाजाला योग्य असे मार्गदर्शन करुन तत्वचिंतन, सदाचार, निर्भयता, नितीमत्ता, सहिष्णुता, इत्यादी सदगुणांची अमृतवाणीची पेरणी आपल्या शब्दशैलीतून केली. वारकरी सांप्रदायाचे दैवत पांडूरंगाला प्रसन्न करुन घ्यायचे असेल तर योग, जप,तप, तीर्थ, व्रत वैकल्ये या साधनांची काहीही आवश्यकता भासत नाही. केवळ आणि केवळ अंतकरणातून पांडुरंगाचे अंतःकरण पुर्वक चिंतन हवे हा मुलमंत्र त्यांनी देतांना असे सांगितले की,
‘योग-याग तप धर्म । सोपे वर्म नाम घेता॥
तीर्थव्रत दान अष्टांग। याचा पांग आम्हा नको॥
आणि आपल्या अभंगाच्या माध्यमातून लोकांना मार्ग दर्शवला. जनसामान्यांना आत्मउन्नतीचा मार्ग दाखवत असतांना ते म्हणत असत की,
‘प्रपंची असूनि परमार्थ साधावा। वाचे आळवावा पांडुरंग ।
मोट, नाडा, विहीर, दोरी। अवघी व्यापिली पंढरी,’
अनासक्त वृत्तीने ईश्वरार्पण बुद्धीने केलेला प्रपंच परमार्थ होतो, हीच त्यांची जीवननिष्ठा होती. त्यांना मोक्ष-मुक्ती नको होती. ‘वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी’ ही त्यांची प्रतिज्ञा होती
‘स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातो हात।’
‘सावत्याने केला मळा। विठ्ठल देखियला डोळा।’
या ओळींतून त्यांची जीवननिष्ठाच स्पष्ट होते. त्यांच्या अभंगांत नवरसांपैकी वत्सल, करुण, शांत, दास्य-भक्ती हे रस आढळतात. अशा या संतश्रेष्ठ सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी प्रणाम.
गणेश खाडे
संस्थापक वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा
वंजारी समाज इतिहास अभ्यासक व
लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक 9011634301