दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केले, त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं.
त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्यापुढे मोठं पक्षसंकट उभ ठाकलं आहे. शिवसेनेतील या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच जाहीर मुलाखत दिली आहे. ही मुलाखत दै. सामनाचे संपादक खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पालापाचोळ्यानं इतिहास घडवला आहे. हे जनतेला माहित आहे. इतिहास घडवणारे कोण असतात, हे जनतेने पाहिले आहे. आमची लढाई सत्तेसाठी नाही. आमची लढाई बाळासाहेबांच्या विचारांसाठी होती. बाळासाहेबांच्या विचारांच्या भूमिकेतून आम्ही हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांना पालापाचोळा, पानगळ काय म्हणायचा हा त्यांचा अधिकार आहे . परंतु पुन्हा एकदा सांगतो की, याच पालापाचोळ्याने इतिहास घडवला आहे’.
========================
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे ?
उद्धव ठाकरे म्हणाले होते की,’वादळ म्हटल्यानंतर पालापाचोळा उडतोच. तो पालापाचोळा उडतोय सध्या आणि पालापाचोळा एकदा खाली बसला की खरं दृश्य लोकांसमोर येईल. सडलेली पानं ही झडणारच आणि ती झडलीच पाहिजेत. पानगळ झाली की झाड उघडं बोडकं दिसायला लागतं. पण काहीच दिवसांत झाडाला पुन्हा नवी पालवी फुटते. आपल्या झाडालाही नवे अंकुर फुटतील कारण शिवसेना आणि युवक हे नातं सेनेच्या जन्मापासून आहे. पालापाचोळा म्हणजे ठाणेकर नाहीत’
====================