दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली – आगामी काळात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे सरकार इलेक्ट्रिक हायवे विकसित करण्याच्या शक्यतेवर विचार करीत असल्याचे केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी इंडो- अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत बोलताना सांगितले.
भारत सरकार सौर आणि पवन ऊर्जा निर्मितीवर भर देत आहे. इलेक्ट्रिक हायवेवर अशा प्रकारच्या ऊर्जा निर्मितीद्वारा सर्व वाहनांचे चार्जिंग उपलब्ध करण्याच्या शक्यतेवर विचार करण्यात येत आहे.
इलेक्ट्रिक हायवे म्हणजे या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना मुबलक चार्जिंग उपलब्ध करणे होय. त्याचबरोबर असे चार्जिंग ओव्हरहेड चार्जिंग लाईनच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात येत असते. देशातील टोल प्लाझावरील वीज सौरऊर्जेच्या माध्यमातून निर्माण करण्याच्या शक्यतेवर विचार करण्यात येत आहे.
रस्त्यासह विविध पायाभूत सुविधा विकसित झाल्यानंतर त्यामुळे खऱ्या अर्थाने विकास दर वाढण्यास मदत होते. भारताला विकासदर वाढवून गरिबी दूर करायची आहे. यासाठी पायाभूत सुविधा वाढविणे गरजेचे आहे. या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने अनेक पातळ्यावर पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.