दैनिक चालु वार्ता परभणी उपसंपादक- दत्तात्रय कराळे
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत हा स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला खरा. पण, मराठवाडा स्वतंत्र होण्यासाठी तब्बल १३ महिने निकराची झुंज द्यावी लागली. १९४८ चं वर्ष आणि १७ सप्टेंबर हा दिवस उजाडावा लागला. त्याच दिवशी हैदराबाद संस्थान खालसा झालं नि मराठवाड्याचा स्वतंत्र भारतात करावा लागला समावेश. केवढा होता तो जहाल संघर्ष. या संघर्षाला लाभलेल्या यशाचे प्रतिक म्हणूनच गेली ७४ वर्षे मराठवाडा जो उभा आहे, त्याच संघर्षाची खरी कहाणी जाणून घेतली तर प्रत्येकाच्या अंगावर शहारे उभारल्या शिवाय राहाणार नाहीत.
—————————————-
औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर), जालना, परभणी (प्रभावती नगर), नांदेड (नंदीग्राम), हिंगोली, लातूर, बीड आणि उस्मानाबाद (धाराशिव) हे आठ जिल्हे मिळून झालाय तोच एकसंघ मराठवाडा होय. गोदावरी, पूर्णा, दूधना, मांजरा या मुख्य तर सीवना, पेनगंगा, सीना, व बिंदूसारा या उपनद्यांच्या खोऱ्यात आणि ६४२८६.७ चौरस कि.मी. अशा विस्तीर्ण भू-प्रदेशावर विखुरलेला प्रदेश म्हणजेच आजचा मराठवाडा. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक धगधगतं पर्वच म्हटलं तर मुळीच चुकीचं ठरणार नाही. १९४७ च्या १५ ऑगस्टला भारत स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला खरा. पण, हाच मराठवाडा स्वतंत्र होण्यासाठी तब्बल १३ महिन्यांचा संघर्ष करावा लागला. तद्वतच १९४८ मधला १७ सप्टेंबरचा दिवस उजाडावा लागला. याचं एकमेव कारण म्हणजे हैदराबाद खालसा होऊन याच मराठवाड्याचा स्वतंत्र भारतात समावेश होण्यासाठी करावा लागला एक समान संघर्ष. किंबहुना त्याच संघर्षाला लाभलेल्या यशाचे प्रतिक म्हणूनच गेली ७४ वर्षे मराठवाडा उभा आहे. त्याच संघर्षाची खरी कहाणी जाणून घेतली तर खरोखरच अंगावर शहारे उभारल्या शिवाय राहाणार नाहीत एवढं नक्की.
मराठवाडा इतिहास
————————-
स्वातंत्र्यपूर्व हिंदुस्थान म्हणजे अनेक राजे, महाराजे, सरदार आणि टोळ्यांची संस्थानं, सत्ता केंद्रांचा वेगवेगळा समूहच होता. कालांतराने व्यापाराच्या उद्देशाने भारतात आलेल्या इंग्रजांनी चक्क भारतावरील कब्जाच केला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर राज्यकर्तेही होऊन बसले. परिणामी येथे असलेल्या सर्व राजांना पाडाव करुन घ्यावा लागला किंवा त्यांना इंग्रजांच्या अधिन जावे लागले. निजाम राजवट असलेले हैदराबाद संस्थान ही ब्रिटीश साम्राज्याचा एक हिस्सा ठरले. मराठवाडा हा निजामी राजवटीचाच एक भाग होता. दरम्यान हिंदुस्थानची फाळणी झाली अन् भारत व पाकिस्तान अशी दोन राष्ट्रं उदयास आली. स्वतंत्र भारतात असलेल्या संस्थानं आणि संस्थानिकांसमोर तेव्हा भारत किंवा पाकिस्तान असे दोन प्रस्ताव ठेवण्यात आले. हा प्रस्ताव भारत सरकार आणि तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी ठेवला होता. याच प्रस्तावाला प्रतिसाद देत भारतातील बहुतांश सगळीच संस्थानं भारतात विलीन व्हायला तयार झाली. अपवाद होता तो फक्त आणि फक्त हैदराबाद, जुना गड आणि जम्मू-काश्मिर या संस्थानांचा. त्यातही हैदराबाद संस्थान प्रमुख निजामाचा डाव होता होता की, हैद्राबाद हे ‘स्वतंत्र राष्ट्र’ म्हणून घोषित करायचं किंवा पाकिस्तान मध्ये सहभागी व्हायचं. इथे सुरु झाला तो हैद्राबाद मुक्ती संग्राम आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम असा थरार.
हैद्राबाद मुक्ती संग्राम
————————-
हैद्राबाद संस्थान हे महाराष्ट्रातील मराठवाड्याचे ८ जिल्ह्यांसह आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड अशा राज्यांमध्ये विस्तारले होते. या संस्थानाचा आवाका (परिसर) विस्तारित असल्यामुळे निजामाने भारत सरकारचा प्रस्ताव धुडकावला आणि थेट पाकिस्तानात सहभागी होण्याची तयारी केली. त्यामुळे हैद्राबाद संस्थान ने सशस्त्र मार्गाचा अवलंबही केला. परिणामी भारत सरकारलाही सशस्त्र कारवाईच करावी लागली. तसाही हा संघर्ष अटळ होताच. कारण, हैद्राबादचा निजाम स्वत:च्या संस्थानासोबत पाकिस्तानात गेला असता तर, भारताच्या मध्यभागी पाकिस्तानचा भूप्रदेश आला असता ज्यामुळे भारताच्या भविष्यासाठी कायमचा धोका निर्माण झाला असता. किंबहुना त्यासाठीच भारत सरकारने थेट संघर्ष करण्याचाच पवित्रा घेतला.
कासीम रझवीची रझाकार संघटना
———————————-
सन १९३८ ते १९४८ हा कालखंड मराठवाडा मुक्ती संग्रामाचा प्रमुख कालखंड म्हणून ओळखला जातो. याच काळात मराठवाडा निजामाच्या राजवटीतून मुक्त करण्यासाठी वेगवेगळी राजकीय आंदोलने, विद्यार्थी चळवळीत इतकेच नाही तर सशस्त्र आंदोलने देखील झाली. हा विरोध मोडून काढण्यासाठी हैद्राबादच्या निजामाने कासीम रझवी याच्या मदतीने रझाकार संघटनेची स्थापना केली आणि मराठवाड्यातील जनतेवर अत्याचार करायला सुरुवात केली. निजामाने या रझाकार संघटनेचा वापर करुन संस्थानातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अर्थात हा निजामाचा स्वतःचे राज्य टिकवण्याचा प्रयत्न होता परंतु १५ ऑगस्ट १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले किंबहुना त्यामुळेच मराठवाड्यातील जनतेच्या विरोधात्मक आंदोलनाला अधिकच चालना मिळाली. यातच निजामाच्या हुकुमशाही राजवटीला उघड उघड आव्हान म्हणून ७ ऑगस्ट रोजी भारतीय संघ राज्यात सामील होण्याचा दिवस आणि १५ ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्याचा दिन म्हणून साजरा करण्याचेआवाहन करण्यात आले. त्या आवाहनाला जनतेतून प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर वेगवेगळे कृती कार्यक्रम हाती घेऊन निजामाच्या सत्तेची पाळेमुळे खणून काढण्यास सुरुवात झाली.
निजाम शरण, संस्थान खालसा अन् मराठवाडा मुक्त झाला
—————————————
भारतीय सैन्याने हैदराबाद संस्थान आणि रझाकार संघटनेस चारी बाजूंनी पूरतं घेतलं होतं. १३ सप्टेंबर १९४७ भारतीय सैन्याने आपला मारा अधिकच तेज केला.
त्यामुळे निजामाचे सैन्य आणि रझाकारांना नमते घ्यावे लागले. अखेर हैदराबाद संस्थान आणि निजामाचा सेनाप्रमुख जनरल अल इद्रीस हा १७ सप्टेंबर १९४८ रोजी भारत सरकारला एकदाचा शरण आला. त्यामुळे खुद्द निजामालाही शरण येणे भाग पडले. तेव्हा कुठे हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात सहभागी झाले. परिणामी मराठवाडा मुक्त झाला. मराठवाडा मुक्ती संग्राम आंदोलन तब्बल तेरा महिने लढले गेले. याच कारवाईला पोलीस ॲक्शन असे संबोधले गेले. सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेली ही पोलीस ॲक्शन देशाच्या इतिहासात अजरामर ठरावी अशीच होती. या कारवाईमुळेच आजचा एकसंघ भारत उदयास आला हे अभुतपूर्व असेच म्हणावे लागेल.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन
———————————-
मराठवाडा मुक्तीसाठी जोर शोर से करावा लागलेला संघर्ष अखेर १७ सप्टेंबर दरम्यान संपला अन् मराठवाडा मुक्तही झाला. तरीही पुढची अनेक वर्षे १७ सप्टेंबर हा ‘मराठवाडा मुक्ती संग्राम दिन’ म्हणून साजरा करण्यात येत नव्हता. या संग्रामात नंतर काही वर्षांनी वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, तेव्हापासूनच प्रत्येक वर्षी १७ सप्टेंबर रोजी “मराठवाडा मुक्ती संग्राम दिन” साजरा करण्यात येतो. मराठवाडा मुक्ती संग्राम इतिहास चिरंतन राहावा, तो सतत दृष्टीक्षेपात रहावा, या विचारातून मराठवाडा मुक्ती दिन समिती गठीत करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये “मराठवाडा मुक्ती दिन साजरा करण्याची प्रथा सुरु झाली. याच संग्रामाच्या स्मरणार्थ एक मुक्ती स्तंभ उभारण्यात आले. जो आजही औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर) येथे मोठ्या डौलाने, दिमाखात उभे आहे.
आजचा मराठवाडा
———————–
आजचा मराठवाडा हा महाराष्ट्र राज्याचा एक मोठा, एकसंघ असा भूराजकीय प्रदेश आहे. राजकीय, शैक्षणिक अशा सर्वंच क्षेत्रात मराठवाड्याला पुरेपूर संधी मिळाली आहे. सत्तेच्या माध्यमातून मराठवाड्यात सहकार सहकार क्षेत्रही चांगलेच विस्तारले आहे. असे असले तरीही मराठवाड्याला अद्याप आपला पुरेसा विकास साधता आला नाही. त्याचाच परिपाक म्हणून मराठवाड्यात कधी ओला तर कधी सुखात दुष्काळ, पाणी टंचाई, बेरोजगारी असे एक ना अनेक प्रश्न आजही जैसे थे आणि कमालीचे भेडसावणारे आहेत. मराठवाड्यात आर्थिक आणि सामाजिक विषमताही मोठ्या प्रमाणावर पहायला मिळते. त्यामुळे येत्या काही वर्षांत मराठवाड्याला सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणावर सामुहिक प्रयत्न करावे लागणार आहेत. एकसंघ राज्य महाराष्ट्राचे नि आपले हक्काचे सरकार असले तरीही प्रसंगी लढा हा निकराचा द्यावाच लागणार आहे.
— लेखक —
दत्तात्रय वामनराव कराळे
ज्येष्ठ पत्रकार, परभणी
संपर्क : ९८६०११७५९२