
दैनिक चालु वार्ता,शिरपूर
प्रतिनिधी:- महेंद्र ढिवरे
गेल्या काही महिन्यांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. या पावसानं तर राज्यभरात रौद्र रुप धारण केलेलं पहायला मिळत होत. अशातच काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली होती.आता ऐन दिवाळी पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात 1 नोव्हेंबर पासून पुढच्या 5 दिवसात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. त्यामुळे पुन्हा एकदा ऐन दिवाळीत पावसाची हजेरी पहायला मिळणार आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाऱ्यांचा वेग देखील अधिक राहण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.
तमिळनाडूच्या किनारपट्टीवर कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मान्सूनच्या परतीनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान तयार होतं आहे. 30 ते 40 किमी प्रतितास वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
मान्सून ब्रेक झाल्यानं परतीचा पाऊस महिनाभर लांबणीवर गेला होता. त्यामुळे वातावरणात खूप बदल झालेले पहायला मिळाले. या बदलांमुळे अनेकांचं नुकसान झाल्याचं चित्र आहे.
अशातच आता मोसमी वारे परतीला जाण्यासाठी पूरक वातावरण असून, याचे परिणाम राज्यातील काही भागांवर दिसून येणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
आता पावसासोबतच थंडीचाही जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्यास सांगितलं जात आहे.