दैनिक चालु वार्ता परभणी उपसंपादक – दत्तात्रय कराळे
परभणी : शहराच्या कुशीत नि गावच्या पंचक्रोशीत राहून शेतकरी विकासाचा गावगाडा हाकणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणूकीत मांडाखळी येथे जनशक्तीने धनशक्तीवर मोठी मात करत वर्चस्वाची लढाई जिंकली आहे. तुळजाभवानी इंद्रायणी शेतकरी ग्रामविकास पॅनेलने १३ पैकी १३ही जागांवर विजयाचा झेंडा फडकावला आहे. “ज्या मैदानात पराभवाच्या चवीने रंगविली चर्चा तेथेच उधळवला विजयाचा गुलाल मोर्चा” या उक्तीप्रमाणे केवळ मांडाखळीचेच नव्हे तर संपूर्ण पंक्रोशीचे राजकीय वातावरण न भूतो, न भविष्यति असे ढवळून निघाले आहे.
पॅनेल प्रमुख पंढरीनाथ घुले यांच्या नेतृत्वाखाली आणि समाज सेवक सुरेश काळे यांच्या विचाराने प्रेरित या पॅनेलने गनिमी कावा अंमलात आणत ही विजयाची खेळी साध्य केली. संपूर्ण पंचक्रोशीला आदर्शवत ठरु शकेल असे डावपेच खेळून शेतकरी विकासाचा गावगाडा अधिक हितकारी कसा चालविला जाईल याचेही महत्व या पॅनेलने प्रत्येक मतदारांच्या मनात रुजवले असावे, जणू असेच या विजयातून दिसत आहे.
संपूर्ण पंचक्रोशीत विजयी उमेदवारांचे अभिनंदन मोठ्या उत्साहात केले गेले. जिद्द व चिकाटीने सोसायटीचा कारभार हाताळताना पारदर्शकता ही गरजेची असते. किंबहुना त्याच पारदर्शकतेचा कित्ता गिरवला जाईल अशी आशा या विजयातून दिसत आहे.