दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : शहरापेक्षा ग्रामीण भागात राष्ट्रवादी अधिक बळकट आहे. पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता मिळवायची असेल तर मेहनत घेणे जरुरीचे आहे. पक्षाबरोबरच स्वतःलाही निसटता विजय पहायला नको असेल तर सभासद नोंदणीला अधिकाधिक प्राधान्य देऊन ती मोठ्या प्रमाणात करणे ही गरज आहे असे सांगून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील पुढे असेही म्हणाले की, स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी प्रत्येकाला कष्ट करण्याची खरी गरज आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल रात्री परभणी शहर व ग्रामीण कार्यकारिणीची आढावा बैठक घेतली. त्यावेळी शहर कार्यकारिणी अध्यक्ष प्रतापराव देशमुख यांनी केलेली नोंदणी व प्रगतीचा चढता आलेख बघून श्री पाटील यांनी समाधान व्यक्त केले. त्यामुळे श्री पाटील यांनी देशमुख यांना काही महत्वाच्या सूचनाही केल्या. जो कार्यकर्ता पक्षवाढीसाठी अधिकाधिक जोमाने काम करतो, त्याला टिकीट द्यायला काहीच हरकत नाही असे सांगून पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळवून देणं हे प्रत्येक कायकर्त्याचं कर्तव्यच आहे. पक्षाची ध्येय धोरणं तळागाळापर्यंत पोहचवून पक्षवाढ अधिक कशी करता येईल यावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचं असल्याचं पाटील म्हणाले.