दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय वामनराव कराळे यांनी बघता बघता आज आयुष्याची सत्तरी गाठली आहे. सत्तरीच्या उंबरठ्यावरील आजचा त्यांचा वाढदिवस जरी औपचारिकता असली तरी हे आयुष्य जगताना आणि मार्गक्रमण करतांना जीवन पटलावर जो काही संघर्ष करावा लागला, त्याची कथा नि व्यथा मांडतांना निश्चितच आश्चर्यकारक असा धक्का बसल्याशिवाय राहाणार नाही. शिवाय काही ठिकाणी कौतुकही करावे लागेल असा त्यांचा बहुआयामी जीवन प्रवास आहे, असं म्हटलं तर मुळीच चुकीचं ठरणार नाही.
राज्याची राजकीय आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला महामाया नगरी म्हणूनही संबोधले जाते. अशा या महानगरीत सुमारे ५२ वर्षांचा कार्यकाळ घालवतांना दत्तात्रय कराळे यांना अनेक यातना सहन कराव्या लागल्या.
दिवसा नोकरी व रात्रीच्या शाळेत शिक्षण घेत त्यांनी आपला चरितार्थ अगदी नेटाने चालविला. कधी भाड्याच्या साध्या घरात तर कधी खानावळीला दुसऱ्याकडे राहून प्रसंगी रात्रीचा विसावा म्हणून त्यांनी काही वर्षे रेल्वे स्थानकातील फलाटावरच झोपून वेळ साधून नेण्याचा प्रयत्न केला. सकाळी उठून प्रथमतः थंड पाण्याने का होईना परंतु नियमित आंघोळी, नंतर घराबाहेरच परिस्थितीमुळे झेपेल असा नास्ता करायचा व नंतर कागदामध्ये चपाती व सुकी भाजी गुंडाळून घेत कामावर जायचे. सोबत एका प्लास्टिक पिशवीत शाळेचे दफ्तर न विसरता नेणे व संध्याकाळी कामावरुन सुटल्यानंतर साडे सहा वाजता शाळेत जायचे. रात्री दहा वाजता शाळा सुटल्यानंतर दुसऱ्याच्या म्हणजे जेथे खानावळीला रहायचे तेथे जाऊन मिळेल ते जेवायचे व नंतर पुन्हा झोपण्यासाठी रेल्वे स्टेशन गाठायचे असा नियमित जर्जर जीवन प्रवास असायचा. त्यातही रात्रीचा पाऊस आला तर मात्र अंथरुण गुंडाळायचे व डुकल्या देत तसेच बसून राहायचे, नव्हे दुसरा कोणता पर्याय सुध्दा नसायचा. कालांतराने काही मित्रांबरोबर झालेल्या ओळखीमुळे त्यांच्याकडून आर्थिक मदत मिळवत एका झोपडीत २०० रुपये अनामत (डिपॉझिट) ठेऊन प्रतिमहा १५ रुपये भाड्याने कशीबशी एक रुम मिळविली होती. तेव्हा मात्र झोपण्यासाठी भाड्याचे असले तरी हक्काचे एक घर झाले होते. एवढाच काय तो दिलासा वाटायचा.
नव्याने भाड्याने घेतलेल्या रुममध्ये सकाळी पाच वाजता उठून जेवण बनविणे, आंघोळी करणे व स्वतःचे स्वत:च कपडे धूवून नेहमी प्रमाणे प्रथम कामावर आणि नंतर शाळेत हा सिलसिला जुनी अकरावी पर्यंत सतत चालला. रात्रौ १० च्या नंतर घरी आल्यावर स्वयंपाक बनविणे व जेवणे नंतर झोपणे हा क्रम चालू राहिला. जसा वेळ मिळेल तसा अधूनमधून अभ्यासही करावा लागत असे. लहानपणापासूनच लिहिण्या-वाचण्याची सवय असल्याने हळूहळू वृत्तपत्रांमध्ये लिखान करण्याची आवड निर्माण झाली होती. इत्तर वृत्तपत्रांच्या वाचनाचे सातत्य टिकवून ठेवल्यामुळे बातम्यांचा ओघ कांहिंसा लक्षात येणे स्वाभाविक होते. प्रारंभी छोट्या स्वरुपात लिहिल्या जाणाऱ्या बातम्या आपोआपच मोठ्या आकाराच्या बनल्या जात असत. तत्कालीन आमदार भाई केशवराव धोंडगे यांच्या सा. जयक्रांती मधून सुरु झालेले वृत्तपत्रीय लेखन हळूहळू नांदेड येथील रमेश रसाळ यांचे गोदातीर समाचार, सुधाकरराव डोईफोडे, रामेश्वर बियानी यांचे प्रजावाणी आणि तत्कालीन समाजसेविका सूर्यकांता पाटील यांचे गोदावरी टाईम्स, सा. पंचनामा आणि श्री रावके यांच्या वृत्तपत्रांमधून फ्री लान्सर म्हणून अधूनमधून बातम्या प्रसिद्ध होत असत. त्यामुळे कमालीचा उत्साह वाढीस लागणे स्वाभाविक होते. मुंबईतही आचार्य अत्रे यांच्या नंतर त्यांची कन्या शिरीष पै चालवत असलेला मराठा, निळूभाऊंचा नवाकाळ, पवारांचा मुंबई सकाळ, पु. रा. बेहरे यांचे नवशक्ती, लोकसत्ता, श्री वाबळे यांचे शिवनेर या वृत्तपत्रांमधून कधी “वाचकांचे व्यासपीठ” या सदरातून तर कधी बातम्यांमधून लागलेली गोडी अधिकच वाढीस लागली अन् वाढत्या ओळखीमुळे नंतर कधी पाव पान तर कधी अर्धे पान आकाराच्या बातम्याही हळूहळू प्रसिद्ध होऊ लागल्या. त्याकाळी नवाकाळ मध्ये चंद्रकांत पुरंदरे, श्री मोने, लोकसत्तामध्ये वसंत शिंदे, माधव गडकरी, नवशक्ती चे अशोक पडबिद्री, सकाळचे विजय कुवळेकर, मार्मिकचे पंढरीनाथ सावंत, युगारंभचे संपादक मधु रावकर आणि त्यांच्या संगतीने कधी कधी निळूभाऊ खाडीलकर, स्तंभ लेखक भाऊ तोरसेकर, व्यंग चित्रकार विकास सबनीस यांच्याशी बरीच जवळीक साधली गेली होती. मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष असतांना चंद्रकांत काका पुरंदरे, वसंत शिंदे यांचेशी तर एवढे जिव्हाळ्याचे संबंध बनले गेले ते थेट एकमेकांच्या घरी जाण्यापर्यंत वाढले गेले होते. या साऱ्या वृत्तपत्रीय ओळखीचा फायदा पुढे सन १९८९ साली जेव्हा स्वत:चे “महामुंबई” नामक मराठी साप्ताहिक सुरु केले तेव्हा तो अधिकच
वाढीस लागला. त्या कालावधीत ज्येष्ठ पत्रकार तथा स्तंभलेखक विजय साखळकर यांनी अमूल्य असे सहकार्य केले. गुरुदत्त लाड आणि हेमंत जोशी यांच्या ओळखीने साखळकर यांच्याशीही बरीच मैत्री जमली होती.
शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते “महामुंबई” या मराठी साप्ताहिकाचे प्रकाशन झाले त्यावेळी त्या कार्यक्रमाला तत्कालीन आमदार गजानन कीर्तिकर, आमदार रामदास कदम, आमदार नंदकुमार काळे, आताचे आमदार व त्यावेळी गजाभाऊंचे पीए असलेले सुनील प्रभू, नगरसेवक महादेव मोटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीत ज्यांच्या आशीर्वादाची थाप पाठीवर मिळाली होती, ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वाचे गाठोडे आजही शीदोरी म्हणूनच जोपासले जात आहे. तशीच संधी वर्षभरानंतर पुन्हा एकदा मिळाली होती. वर्षभरात जी काय प्रगती केली आहे, ती तपासण्याकरिता वंदनीय बाळासाहेबांनी मातोश्री बंगल्यावर वर्षभराचे छापलेले अंक घेऊन बोलावले होते. संध्याकाळी सहा वाजताची वेळ भेटण्याची ठरली होती, परंतु अर्धा तास अगोदरच गेल्यामुळे बाळासाहेबांचे तत्कालीन पीए चिंतामणी हे तेथे नसल्याने स्वतः उध्दवजींनी मला “साहेबांनी तुम्हाला अर्धा तास थांबण्याचे सांगितले आहे असे म्हणत थांबणार ना, तुम्ही ?” असे जेव्हा श्री कराळे यांना उध्दवजींनी विचारले तेव्हा साहेबांनी सांगितले अन् मी थांबणार नाही, असे कसे होणार ? असा प्रतिप्रश्न त्यावेळी त्यांनी उध्दवजींना केला असल्याचे आजही स्मरणात असल्याचे मत श्री कराळे यांनी व्यक्त केले. पुढे श्री कराळे यांनी केलेले कथन असै की,
बरोबर सहा वाजता जुना मातोश्री बंगल्यात मी जेव्हा आत गेलो तेव्हा बाळासाहेब आणि त्यांच्या समोरच्या सोफ्यावर नारायण राणे, वामनराव महाडीक हे तत्कालीन दोन्ही नेते बसलेले बघून मी थोडा चकाकलो अन् तसाच उभा राहिलो परंतु बाळासाहेबांनी उभे न राहू देता थेट स्वत:घ्या बाजूलाच बसण्यास सांगितले. माझे मन भरुन आले होते. वर्षभराचे सगळे अंक एकत्र बाईंड करुन दिलेले बघताच बाळासाहेब एकदम खुश झाले होते. अर्धे अंक पडताळून बघताच शाब्बासकी ची थाप माझ्या पाठीवर देत सन्माननीय बाळासाहेबांनी नारायण राणे यांना माझ्या प्रगतीचे तोंड भरुन कौतुक सांगितले. त्यामुळे माझ्या डोळ्यात अक्षरश: खुशीचे अश्रू आले होते. तेवढ्यात औरंगाबाद येथे तत्कालीन खासदार मोरेश्वर सावे यांनी काही तरी गडबड केल्याचा फोन आल्याने खुशीत हसणारे बाळासाहेब क्षणार्धात क्रोधित बनले गेले. हे बघून मलाही थोडं वेगळच वाटलं परन्तु त्यातूनही औपचारिकता म्हणून बाळासाहेबांनी आवर्जून मागवलेला चहा मला घेणे भाग पडले होते. तोही क्षण आजन्म अविस्मरणीय असाच राहिला जाईल यात तिळमात्र शंका नाही.
हळूहळू स्वत:चा लेटर प्रेस एका बाजूला अन् दुसऱ्या बाजूला साप्ताहिक पेपर जोमाने सुरु ठेवला होता. शिवसेनेच्या शाखा शाखांतून प्रेस मध्ये छपाईचे काम मिळत राहिले आणि पत्रकार म्हणून संघटनेच्या सर्व कार्यक्रमांना आवर्जून उपस्थितीचे निमंत्रण, बातम्या हे सत्र पुढे नियमित असेच झाले होते. त्यानंतर नव्वदच्या दशकात वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे कंधार तालुका संपर्कप्रमुख म्हणून माझी नियुक्ती झाल्याचे पत्रच मला धाडले गेले. त्यामुळे तर आनंदाचे भरतेच आले होते. मग तर काही सांगायलाच नको. सगळीकडे सत्कार सोहळे व निमंत्रणांचा ओघ सुरू झाला. मध्यावधी निवडणूका जाहीर झाल्या अन् नियुक्त्या झालेल्या आम्हा सर्व सहकाऱ्यांना नांदेड जिल्ह्यातील त्या त्या तालुक्यावर रवाना होणे भाग पडले होते. जिल्हा संपर्कप्रमुख चंद्रकांत बागवे यांच्या नेतृत्वाखालील टीमची प्रारंभी नांदेडमधील एका लॉज मध्ये राहाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तदनंतर शेवटच्या टप्प्यात त्या त्या मतदारसंघातील कार्यक्रम, बैठका, जाहीर सभा व प्रचाराची रणधुमाळी यासारखे कार्यक्रम इलेक्शनच्या अखेरपर्यंत चालूच राहिले होते. नव्वदच्या दशकात निसटत्या मतांनी पराभूत झालेले सेना उमेदवार रोहिदास चव्हाण हे १९९५ च्या निवडणूकीत मात्र विजयी झाले होते. निवडणूक काळात माझा पेपर आणि प्रेस या दोन्ही उपक्रमांवर बरेच दूर्लक्ष झाले होते. परिणामी संघटना प्रेमापोटी झालेले आर्थिक नुकसान पुन्हा छपाईच्या कामांमधूनच सावरणे भाग पडले होते.
सन १९९९ साली कांदिवली येथून मी माझ्या परिवारासह नालासोपारा येथे स्थलांतर केले. तेथे आल्यानंतर साधारण वर्षभराचा कालावधी मी दुसरे एक मराठी दैनिक चालवण्यास घेतले होते. तोपर्यंत दिल्ली येथून माझे स्वतःचे “कराळे समाचार”नामक मराठी टायटल आले होते. आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यक्षेत्रात सलग २४ वर्षे मी माझे दैनिक कायमचे सातत्य टिकवून ठेवत चालवले. आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या शुभहस्ते माझा स्वमालकीचा ऑफसेट प्रिंटींग प्रेस सुरु करुन तेथेच वृत्तपत्राचे मुद्रण सुरु केले. संपूर्ण परिवार एकनिष्ठ होऊन या वृत्तपत्रीय व्यवसायात कार्यरत झाले होते किंबहुना त्यासाठीच “कराळे समाचार” हे नाव ठेवण्याचा मनोदय सुध्दा सार्थकी ठरवला गेला. अगोदरचा ठाणे व नंतरचा पालघर या जिल्ह्यात कराळे समाचार हे दैनिक पूरते नावारुपाला आले होते. त्यासाठी आ. हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या पक्षाचे बहुतांश नगरसेवक यांनी सर्वोतोपरी सहकार्य करुन मोलाचे योगदानही दिले. त्यामुळे उत्तरोत्तर प्रगतीचा आलेख वाढतच गेला. त्या दरम्यानच्या काळात महाराष्ट्र शासनाचे “विशेष कार्यकारी अधिकारी” म्हणून सतत सात वर्षे काम पाहिले. पालघर जिल्हा संपादक असोसिएशन, श्री वामन-गंगा ट्रस्ट, श्रीप्रस्थ सिटीझन वेल्फेअर असोसिएशन या नोंदणीकृत संस्थांचे अध्यक्षपद आणि वसई तालुका पत्रकार संघाचे चिटणीस म्हणून अनेक वर्षे काम सांभाळले आहे. श्री वामन-गंगा ट्रस्ट आणि मराठवाडा विधायक विकास संसद ह्या दोन्ही संस्था अद्यापही कार्यरत आहेत. या संस्थांच्या माध्यमातून अनेक सामाजिक चळवळीला उत्थान देण्याचे काम सदैव सुरुच असते.
मागील दोन वर्षांपासून परभणी येथे वास्तव्य स्थायीक केले आहे. सुमारे ५२ वर्षांचा कार्यकाळ मुंबईत नानाविध समस्यांचा सामना करीत प्रसंगी संघर्षही करीत नेटाने चालविला. फक्त अंगावरच्या सिंगल कपड्यांमध्ये पोटासाठी थेट मुंबई गाठलेला संकटकालीन हा तरुण असंख्य असे खाच खळगे पार करीत राहिला होता प्रसंगी प्रत्येक संकटांवर मात करीत स्वत:चा एक महत्वपूर्ण असा बेस निर्माण करुनच हा पुन्हा आपल्या गावी कायमचा परतला आहे. ‘त्या’ ५२ वर्षांच्या कार्यकाळात असंख्य नामांकित पत्रकार, संपादक, नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, बाळासाहेब ठाकरे यांचे सारखे महान व्यक्तीमत्व, पक्षप्रमुख, पक्ष सचिव, पदाधिकारी, उद्योगपती, दिग्गज राजकारणी यांच्याशी संधान साधत म्हणावी अशी आर्थिक पूंजी नसली तरी मानवरुपी सेवेचे गाठोडे घेऊन पुन्हा आपल्या गावाकडे परतलाय तो आयुष्याची सत्तरी गाठल्यानंतरच, हे विशेष. आहे. दुष्काळसमयी खाली हाताने मुंबईत गेलेल्या या तरुणाने आपल्या स्वकर्तृत्वावरच सन १९८९ मध्ये स्वतःचे लग्न केले. त्यानंतरच्या काळात पोटाची खळगी भरत भरत संसाराच्या वेलीवर चार मुलं जन्मली, त्यात दोन मुलं व दोन मुलींचा समावेश आहे. दोन मुली व एका मुलाचे लग्न झाले असून एका वकील मुलांचे लग्न अद्यापि बाकी आहे. सर्व मुलं-मुली उच्चविद्याविभूषित असून सर्वकाही आलबेल आहे. या वयातही बसून न राहाता तथा वयाची तमा न बाळगता दत्तात्रय कराळे हे आजही पत्रकारिता क्षेत्राशी जुडलेलेच आहेत. मागील वर्षी परभणी शहरासाठी प्रतिनिधी म्हणून मिळालेल्या पदावर कार्यरत राहून समाजसेवा रुपी संधीचे सोने करीत दत्तात्रय कराळे यांनी वैचारिक आणि शोधपत्रकारिता काय असते हे आपल्या लेखणीतून निर्देशीत केले आहे. त्याचेच फलित म्हणून की काय, या वर्षी प्रमोशन होऊन श्री कराळे यांना परभणी जिल्हा उपसंपादक या पदावर बढती मिळाली आहे. ही संधी देणारे पुणे शहरातील एक नामांकित असे एक वृत्तपत्र असून “चालू वार्ता” मराठी दैनिकाच्या रुपात ते जोमाने कार्यरत आहे. मराठवाड्यातील कंधार नगरीचा भूमीपुत्र, एक होतकरु, कर्मठ, जिगरबाज आणि सुशिक्षित तसेच एक उमदा तरुण म्हणून सदैव कार्यरत डी. एस. लोखंडे या नामक मराठी उद्योजक पुणे शहरात रात्रंदिवस कार्यरत आहे. त्यांचेही कौतुक करणे या निमित्ताने माझे कर्तव्यच समजत असल्याचे श्री कराळे यांनी या निमित्ताने सांगितले आहे.