दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली – दिल्ली जल बोर्डमध्ये 20 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.
ज्यांनी घोटाळा केला आहे त्या अधिकाऱ्यांना शोधावे आणि त्यांची जबाबदारी निश्चित करावी व 15 दिवसांत याबाबतचा अहवाल सादर करावा, असे निर्देश मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत.
दरम्यान, नायब राज्यपालांच्या या आदेशावर दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया अद्याप देण्यात आलेली नाही. मात्र सूत्रांच्या हवाल्याने एका माध्यमाने दिलेल्या बातमीनुसार 2019 मध्ये हा घोटाळा प्रथम समोर आला होता. लोकांकडून पाण्यासाठीचे 20 कोटी रुपये वसूल करण्यात आले होते.
मात्र ते जल बोर्डाकडून जमा करण्यात आले नसल्याचे आरोप त्यावेळी करण्यात आले होते. आरोपांनुसार काही बॅंक अधिकाऱ्यांचाही या घोटाळ्यात सहभाग आहे. तसेच राज्यपालांनी ही घोटाळ्याची रक्कम लवकरात लवकर जमा करण्याचेही निर्देश दिले आहेत.