दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:सरकार पशुपालक व शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; ना. राधाकृष्णजी विखे पाटील यांची ग्वाही
राज्याचे महसूलमंत्री मा. राधाकृष्णजी विखे पाटील हे नांदेड दौऱ्यावर असताना राज्य सरकार पूर्णपणे पशुपालक व शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास त्यांनी दिला. राज्यात लम्पी आजाराबाबत दक्षतेचा इशारा दिला असून 30 जिल्ह्यात लम्पीचा शिरकाव आहे. आपण स्वतः याबाबत लक्ष घालून हा जनावरांसाठीचा जीवघेणा आजार आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या असल्याचे मत राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केले.लम्पीरोधक लसींची सरकारकडे उपलब्धता असून पशुपालकांनी घाबरून न जाता पशुधनाची योग्य काळजी घेतली पाहिजे. प्रसंगी आजारग्रस्त पशुधन वेगळे ठेवायला हवे. जी जनावरे लम्पीने दगावली आहेत अशांसाठी शासनातर्फे अर्थसाहाय्य केले जात आहे. यामध्ये दुभत्या गायीसाठी 30 हजार रु., शेतात काम करणाऱ्या बैलासाठी 25 हजार रु. तर लहान कारवडीसाठी 16 हजार रु. केली जात आहे. या व्यतिरिक्तही जिल्हा परिषदेला सानुग्रह अनुदान देण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह आमदार श्री. रामजी पाटील रातोळीकर, जिल्हाधिकारी श्री. खुशालसिंहजी परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षाजी ठाकूर -घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. प्रमोदजी शेवाळे, मनपा आयुक्त श्री. सुनीलजी लहाने, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखीजी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बी. यू. बोधनकरजी, डॉ. अरविंदजी गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.