दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
पुणे : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर प्रत्येक सभांमधून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांवर निशाणा साधत आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून बंडखोर आमदार ठाकरेंना प्रत्युत्तर देत आहेत.
मात्र या दरम्यान बंडखोर आमदार वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहेत. यावरूनच राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे.
दापोलीमध्ये बंडखोर आमदार रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टिका केली होती. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर थेट कुटुंबावर टिका केल्याने शिवसैनिक आक्रमक झाले होते. ठिकठिकाणी राज्यात रामदास कदम यांच्यावर मोर्चे काढले होते. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी शिवसैनिकांची जाहीरपणे माफि मागितली होती. त्यानंतर आता मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत बंडखोर आमदार आणि मंत्री तानाजी सावंत यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी जाहीरपणे माफि मागितली.
या संपुर्ण प्रकरानंतर राष्ट्रवादीने शिंदे गटावर निशाणा साधला आहे. माफीवीरांचे सरकार आल्यावर एकामागे एक माफी मागण्याचे सत्र सुरू झालेय. रामदास कदम यांच्या माफीनंतर आता तानाजी सावंतांना माफी मागण्याची वेळ आली. पुढील काळात एकनाथ शिंदेंना मविआ सरकार पाडून महाराष्ट्राशी गद्दारी केल्याची देखील माफी मागावी लागेल. असं रविकांत वरपे यांनी म्हटलं आहे
दरम्यान, शिवभोजन योजनेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला जात आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले की, खोके घेऊन सत्तेवर आलेल्या सरकारला सर्व सामान्य गरिबाची किमंत काय कळणार ? शिवभोजन योजनेच्या माध्यमातून मविआने कोरोना काळात निराश्रित लोकांना आधार देण्याचं काम केलं. हे खोके सरकार आता गरिबाचा घास देखील हिरावणार आहे.