दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : राजस्थानात मुख्यमंत्रिपदावरून निर्माण झालेला पेच आणखी चिघळण्याची शक्यता आहे. अशोक गहलोत गटाने मुख्यमंत्रिपदासाठी पाच जणांची नावे काँग्रेसच्या नेतृत्वाला दिली आहेत.
यात सी. पी. जोशी. गोविंदसिंह डोटासरा, रघु शर्मा, हरीश चौधरी आणि भंवरसिंह भाटी यांचा समावेश आहे.
राजस्थानमधील पेचप्रसंग सोडवण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाने मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना तातडीने दिल्लीत बोलावले. राहुल गांधींच्या आदेशावरून महासचिव के. सी. वेणुगोपालही केरळहून दिल्लीत दाखल झाले. दरम्यान, जयपूरला गेलेले मल्लिकार्जुन खडगे आणि अजय माकन हे काँग्रेसचे दोन निरीक्षक दिल्लीत परतले. त्यांनी जयपूरमधील घटनाक्रमाची माहिती काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना दिली. दिल्लीत पोहोचलेल्या वेणुगोपाल यांनीही सोनिया गांधींची भेट घेतली. काँग्रेसच्या नेतृत्वाने राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत तसेच सचिन पायलट यांनाही दिल्लीत बोलावले आहे. गहलोत रात्री उशीरा दिल्लीत पोहोचणार असून, पायलट यांनी मात्र येण्यास नकार दिला आहे.
अशोक गहलोत गटाचा सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करायला विरोध आहे. या मुद्यावरून गहलोत गटाच्या 82 आमदारांनी विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी यांच्याकडे रविवारी आपले राजीनामे सोपवले. काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष होण्यासाठी राजस्थानचे विद्यमान मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली असली तरी, आपण म्हणू त्या नेत्याला राज्यात मुख्यमंत्री केले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. सचिन पायलट सोडून कोणालाही मुख्यमंत्री करा, असा गहलोत गटाचा आग’ह आहे.
मल्लिकार्जुन खडगे, अजय माकन या दोघांची शिष्टाई असफल ठरली. कोणत्याही स्थितीत सचिन पायलट यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारले जाणार नाही, असा इशारा गहलोत गटाच्या आमदारांनी दिला. गहलोत यांच्यासोबत 82 आमदार असल्यामुळे पायलट यांच्या बाजूला आता फक्त 26 आमदार उरले आहेत.