दैनिक चालू वार्ता, शहादा
प्रतिनिधी : क्रिष्णा गोणे
शहादा : राज्यातील सर्वात कमी लसीकरण झालेल्या पाच जिल्ह्यात नंदुरबार जिल्ह्याचा समावेश आहे.
त्यामुळे जिल्ह्यात लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आठवडे बाजार असतील किंवा जिल्ह्यातील गर्दीची ठिकाण या ठिकाणी लसीकरण केंद्र उभारले जाऊन लसीकरण केले जात आहे. त्यातच आता जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी आदेश काढून महाविद्यालय आणि शासकीय कार्यालयांमध्ये लस घेतल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता नंदुरबार जिल्हावासियांना कोणत्याही शासकीय कार्यालयात जाताना लस घेतल्याचा पुरावा सोबत बाळगावा लागणार आहे. जिल्ह्यातील लसीकरण वाढावे म्हणून पालकमंत्री के. सी. पाडवी यांनी स्थानिक बोली भाषेत नागरिकांना आव्हान केले आहे. या प्रयत्नामुळे जिल्ह्यात लसीकरणाची टक्केवारी वाढेल, असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे.
लस घेतली असेल तरच रेशन
कोरोना लस घेतली तरच रेशन आणि सातबारा मिळेल, असा निर्णय नाशिक जिल्ह्यातल्या देवळा तालुक्यातल्या सावकी ग्रामपंचायतीने घेतला आहे. एखाद्याने फक्त पहिला डोस घेतला असेल. अथवा दुसऱ्या डोसचा कालावधी उलटूनही तो घेतला नसेल, तर त्या व्यक्तीला रेशन, तलाठ्याकडून देण्यात येणारा सातबारा, ग्रामपंचायतीचे कोणतेही शासकीय दाखले, कागदपत्रे देण्यात येणार नाहीत. सोबतच ग्रामपंचायतीच्या कसल्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. या ग्रामसभेला ग्रामसेवक वैशाली पवार, तलाठी कल्याण कोळी, पोलीस पाटील अश्विनी बच्छाव, आरोग्यसेवक दिनेश शेवाळे यांची उपस्थिती होती. ग्रामपंचायतीने घेतलेल्या या ठरावाचे जिल्ह्यात कौतुक होत आहे.
नियम पालनाचे आवाहन
सध्या परदेशात अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आपल्या देशातही अनेक राज्यात कोरोना रुग्णांचे आकडे वाढत आहेत. सध्या महाराष्ट्र सरकारने निर्बंधामध्ये सूट दिली आहे. हे पाहता लोकांंनी कोरोना नियमांचे पालन करूनच व्यवहार करावेत. सर्वांनी मास्क आवश्य वापरावा. एकाच ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.