दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : राज्यात झालेल्या सत्तांतराचे परभणीतील राजकारणी मंडळींना आता एकापाठोपाठ एक असे धक्के बसायला सुरुवात झाली आहे. त्याचीच परिणीती म्हणून डॉ. राहूल पाटील व बाबाजानी दुर्रानी या दोन्ही आमदारांना जिल्हा नियोजन समितीवरुन दूर हटविले आहे. राज्यात सर्वत्र शिंदे गटाकडे जाण्याचा ओघ मोठ्या प्रमाणात असला तरी परभणी जिल्हा मात्र अद्यापही उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचा अजूनही अभ्यद्य किल्ला असल्याचे बघून कदाचित हे पाऊल उचलणे भाग पडले असावे, असेच दिसून येत आहे.
या दोन्ही आमदारांसह शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे अन्य जे नामांकित पदाधिकारी या समितीवर कार्यरत होते, त्यांनासुद्धा या जिल्हा समितीवरुन हटविले गेले आहे. त्यामुळे या महाविकास आघाडीच्या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीची खळबळ माजली आहे.
दोन्ही आमदार नामनिर्देशित तर विशेष निमंत्रीत म्हणून या समितीवर अन्य पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. राज्य शासनाच्या नियोजन विभागाचे सचिवांनी पत्रक काढून या नियुक्त्या रद्द केल्याचे जाहीर केले आहे. एकूणच या प्रकारामुळे परभणी जिल्ह्याच्या राजकीय परिस्थितीचे चित्रण आगामी काळात कोणते वळण घेऊ शकेल हे लवकरच दिसून आल्याशिवाय राहणार नाही एवढे नक्की.