दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे केलेल्या शिक्षक भरती प्रकरणात कमालीची हेराफेरी झाली असून त्यात आतापर्यंतचे पाचही शिक्षणाधिकारी लिप्त असल्याचे बोलले जात आहे. आवश्यकता नसतानाही करण्यात आलेल्या या भरतीमध्ये महाघोटाळा झाल्याचे बोलले जात आहे. परभणी जि.प.च्या कथित बोगस शिक्षक भरतीमुळे अब्रूची लक्तरे पूरती वेशीवर टांगली गेल्याची वदंता राज्यभर चवीने चर्विली जात आहेत. यापेक्षा दुर्दैव ते कोणते म्हणायचे ?
जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे व विभागीय शिक्षण उपसंचालक दीपक चलते यांनी सदर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने या महान घोटाळ्यात लिप्त पाचही शिक्षण अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी संयुक्त समिती गठित केली जावी अशी मागणी केली आहे.
राज्यात शिक्षक भरती बंद असतांना परभणी जि.प.च्या चतुरस्त्र शिक्षण अधिकाऱ्यांनी मात्र संपूर्ण नियमांची पायमल्ली केली आहे. एवढेच नाही तर चक्क कायदाच धाब्यावर बसवण्याचा घाट घालून जि.प.च्या शिक्षण विभागाचा पर्यायाने परभणी जिल्ह्याचाच बदनामीकारक कडेलोट केला आहे. आपले उखळ पांढरे करुन घेतांना शेकडो शिक्षकांना नियुक्ती देतांना शिक्षक भरतीच्या संहितेमध्ये चक्क खाडाखोडी सारखे खोडसाळ प्रकार करुन शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राची लक्तरे वेशीवर टांगण्याचे कुटील कारस्थान केले आहे. ही भरती प्रक्रिया राबविताना व वाढीव पदी नियुक्त्या देतांना लिप्त अधिकाऱ्यांनी अंमलात आणलेली क्लृप्ती संपूर्ण शिक्षण खात्याची अब्रू चव्हाट्यावर तर आणलीच आहे त्याशिवाय आर्थिक स्वार्थापोटी पछाडलेल्या या अधिकाऱ्यांनी भविष्यात आपल्या नोकरीचे काय होईल याचाही विचार न करता स्वतः:लाच अक्कलशून्य दिवाळखोरीच्या खाईत लोटून घेण्याचा झालेला प्रयत्नही त्यांच्याच अंगलट आल्याशिवाय राहाणार नाही असेच दिसून येत आहे. तथापि अविकसित मागास म्हणून संबोधला जाणारा परभणी जिल्हा शिक्षण क्षेत्रात हेराफेरी साठी मात्र पूरता बदनाम करुन टाकला आहे हे वेगळे सांगायला नको.
या सर्व प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लिप्त अधिकाऱ्यांच्या कार्यालयाची अनेकदा झाडाझडती घेत शिक्षण विभागाच्या उपसंचालकांनी प्रत्यक्ष चौकशीसाठी पाचारण करुनही कथित नियमबाह्य कृत्य लपविण्यासाठी येणे जाणीवपूर्वक टाळले असावे.अर्थात त्यांचा हा मुजोरपणा कारस्थानीच म्हणावा लागेल. असे बेजबाबदार व वरिष्ठांच्या आदशाला न जुमानणारे वर्तन कदाचित त्यांच्याच अंगलट येऊ शकेल अशी वदंता आहे.
दरम्यान हा शिक्षक भरती घोटाळा केवळ आताचाच नसून त्याची पूर्ण पाळेमुळे खणून काढण्याचा चंग मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे व शिक्षण उपसंचालकांनी बांधल्याचे दिसून येत आहे. त्याचाच परिपाक म्हणून सन २०१२ पासून जे जे शिक्षणाधिकारी होते, त्या सर्वांच्या कार्यकाळातील प्रकरणे खणून काढली जाणार आहेत. या काळात बी. आर. कुंडीतील, अशोक आठवले, विठ्ठल भुसारे, श्रीमती वंदना वाव्हूळ आणि विद्यमान गट शिक्षणाधिकारी आशा गरुड आदींच्या कार्यकाळात ही बोगस शिक्षक भरती प्रकरणे उजागर झाली आहेत. त्यामुळे अनेक खासगी शाळांमध्ये केलेल्या यांच्या हातावरील बोगस भरती प्रकरणांमुळे लिप्त या पाचही अधिकाऱ्यांचे पूरते पितळ उघडे पडले जाऊन त्यापोटी हडप केलेल्या मोठ्या संख्येतील आर्थिक नजरानाही बाहेर निघू शकेल यात शंकाच नाही. त्या अनुषंगानेच नियोजित चौकशी समिती सखोल आणि असून पाळेमुळे खोदून लिप्त पाचही कथित अधिकाऱ्यांना जेवढी हवा दाखविल्याशिवाय मुळीच करणार नाही हे नक्की आहे. तसं झालं तर निश्चितच शिक्षण खात्याला लागलेली भ्रष्टाचाराची ही कीड समूळ उच्चाटन करुन फेकली जाण्यास मदत तर होईलच शिवाय भविष्यातही कोणी असा भ्रष्टाचार करण्याचे धाडसही करणार नाही जेणेकरुन शिक्षण खात्याचे पावित्र्य अबाधित राहिले जाईल.