दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-अमरावती विमानतळावरून ६ महिन्यात विमान आकाशात झेप घेणार,असे गत १० वर्षांपासून अमरावतीकरांना स्वप्न दाखविले जात आहे.राज्यातील अनेक छोट्या शहरात विमानसेवा सुरू झाली असताना विभागीय शहर असणाऱ्या अमरावतीत अद्यापही विमानसेवाचा पत्ता नाही.राजकीय मंडळींचे विमानतळा संदर्भात आश्वासन गगन भरारी घेत असताना विमान मात्र अद्यापही जमिनीवरच असल्याचे वास्तव आहे.
अमरावतीच्या प्रतिभा पाटील या देशाच्या राष्ट्रपती झाल्यावर अमरावतीच्या विमानतळाचा विकास होऊन अमरावतीतून मुंबई पुण्यासाठी विमान लवकरच झेप घेणार अशी आशा पल्लवित झाली होती.२०१४ मध्ये अमरावतीचे तत्कालीन आमदार डॉक्टर सुनील देशमुख यांच्या महत्त्वपूर्ण पाठपुराव्यामुळे अमरावती विमानतळासाठी मोठा निधी प्राप्त झाला आणि विमानतळ विस्तारीकरणाला मान्यता मिळाली.१३ जुलै २०१९ रोजी राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावती विमानतळ विस्तारीकरणाच्या कार्याचे भूमिपूजन करण्यात आले आहे.औद्योगिक दृष्ट्या विकसित होणाऱ्या अमरावती शहरात आता उद्योगांना सुद्धा जागा कमी पडत असून अमरावतीच्या विकासाला अधिक गती येण्यास अमरावती विमानतळ अतिशय महत्त्वाचे ठरणार असून सुरुवातीला अमरावती- मुंबई विमान सेवा सुरू झाल्यावर इतर शहरातही अमरावती येथून विमान सेवा सुरू करण्यात येईल.भविष्यात जेट विमानही अमरावतीतून भविष्यात जेट विमानही,उड्डाण घेईल असे आश्वासन त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.आज मात्र काम झपाट्याने सुरू आहे,या पलीकडे अमरावती विमानतळा संदर्भात कोणीही इतर माहिती देत नाही.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी १३ नोव्हेंबर २०१९ रोजी अमरावती विमानतळाची पाहणी केली.त्यावेळी ८७२ मीटर लांबीच्या धावपट्टीचे काम जोमात सुरू असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी सांगितले होते.त्यावेळी विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत कामाची पाहणी केल्यावर २०२० च्या ऑगस्ट महिन्यात अमरावती विमानतळावरून मुंबईसाठी विमान झेप घेणार,असे विमान प्राधिकरण अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी सांगितले होते.
कोरोना काळात अमरावती विमानतळाचे काम थांबले होते.यामुळे २०२० चा ऑगस्ट महिन्यात अमरावती विमानतळावरून विमान झेप घेऊ शकले नाही.विशेष म्हणजे राज्य शासनाने अमरावती विमानतळासाठी ५० कोटी रुपये दिले नसल्याने हे काम रखडले गेले.२७ जानेवारी २०२१ रोजी खासदार नवनीत राणा यांनी सांगितले होते.हे ५० कोटी रुपये शासनाने अमरावती विमानतळाला अद्यापही दिले की नाही हे सध्या तरी कोणालाही ठाऊक नाही.
अमरावती शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बेलोरा येथे अमरावती विमानतळाचे काम सुरू आहे.या विमानतळावरून विमान कधी उडणार हे सध्या तरी कोणीही स्पष्टपणे सांगू शकत नाही.सध्या स्थितीत मात्र एटीआर ७२ विमाने उतरण्याची सुविधा व नाईट लँडगच्या सुविधेसाठी एमएडीसीकडून राईट्स लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली आहे.राइट्स लिमिटेड ही कंपनी केंद्र शासनाचा उपक्रम असून ही कंपनी आरेखन सल्लागार व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम करत आहे.अमरावती विमानतळाला केंद्र शासनाच्या संरक्षण तसेच वन व पर्यावरण मंत्रालयाकडून परवानगी मिळाली आहे.
अमरावती विमानतळावर जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा महावितरण कंपनीच्या वतीने अतिउच्च दाबाच्या वीज वाहिन्यांच्या स्थलांतराचे काम पूर्ण झाले आहे.विमानतळाच्या संरक्षण भिंतीची उभारणी प्रगतीपथावर असून नवीन टर्मिनल इमारत उभारण्यात येत आहे या विमानतळाच्या धावपट्टीची लांबी १३०० वरून १८५० मीटर पर्यंत वाढवण्यात आली असून हे काम देखील सुरू आहे.
मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्येच अमरावती विमानतळाच्या विस्तारीकरणाचे भूमिपूजन केले होते.२०१९ मध्ये मात्र महाविकास आघाडी सरकार राज्य स्थापन झाल्यावर अमरावती विमानतळाच्या कामाकडे दुर्लक्ष झाले.जिल्ह्याच्या पालकमंत्री केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करीत होत्या असा आरोप भाजपचे शहराध्यक्ष तसेच अमरावती एमआयडीसीचे अध्यक्ष किरण पातुरकर यांनी केला आहे.आता अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले असून त्यांच्या प्रयत्नाने येत्या काही दिवसात अमरावती विमानतळाचे काम पूर्ण होईल,असा विश्वास देखील किरण पातुरकर यांनी बोलताना व्यक्त केला.
अमरावती विमानतळाचे काम आज पूर्ण होणार उद्या पूर्ण होणार अशा घोषणा करत केवळ प्रसार माध्यमांमध्ये झळकत राहण्याशिवाय सत्ताधारी नेते मंडळी काही एक करताना दिसत नाही.मी स्वतः आमदार असताना २०१४ मध्ये अमरावती विमानतळाच्या कामाला गती दिली होती.आज मात्र आश्वासना पलीकडे अमरावती विमानतळाचे कुठलेही काम होताना दिसत नाही.यामुळेच अमरावती विमानतळाच्या विकासासाठी जनहित याचिका दाखल करणार असल्याचे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि काँग्रेस नेते डॉ.सुनील देशमुख,यांनी बोलताना सांगितले आहे.