दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- जिल्ह्यातील अतीवृष्टीने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपाई त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करा,नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी ५० हजार रुपये तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा.शेतकऱ्यांची दीड लाखाची माफी झाली परंतु २ लाख रुपये ज्यांचे कर्ज आहे त्यांना देखील कर्जमाफी योजनेत सहभागी करणार अशी घोषणा सरकारने केली होती.परंतू अजुनही उर्वरीत शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाही अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी तातडीने माफ करा.अशा अनेक मागण्यांचे निवेदन प्रहारच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
निवेदन देताना प्रहार शेतकरी संघटनेचे मंगेश देशमुख म्हणाले की, वरील सर्व महत्वपूर्ण मागण्या तातडीने निकाली काढाव्यात आणि सध्या हताश झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा.अन्यथा प्रहार शेतकरी संघटना प्रशासनाच्या वेळ काढू धोरणाच्या विरोधात आंदोलन करेल याची गंभीरतेने नोंद घ्यावी.
राजकीय परिस्थिती पाहता सध्या अमरावतीचे पालकमंत्री हे राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस आहेत.मंत्रीपदाच्या शर्यतीत असलेले आ.बच्चू कडू यांना मंत्रीपद मिळणार असल्याचा विश्वास कायम असून याविषयी जोरदार चर्चा आहे.अशातच आज प्रहार शेतकरी संघटनेने दिलेल्या निवेदनातून शिंदे आणि फडणवीस सरकार हे शेतकऱ्यांबद्दल वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे.येत्या काळात आ.बच्चू कडू काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवेदन देतेवेळी मोर्शी-वरुड विधानसभा प्रमुख डॉ.महेंद्र राऊत,तालुका प्रमुख मंगेश इंगोले,संतोष किटुकले,निलेश वाटाणे,प्रफुल्ल बोकाडे,इस्माईल खान,हर्षल ओकटे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.