दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
शिमला – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिमाचल प्रदेशातील पक्षाच्या प्रचार सभेत पुन्हा काश्मीर कार्ड वापरले. गुजरातमधील प्रचारातही भाजपच्या मोदी-शहा या दोन शीर्षस्थ नेत्यांनी काश्मीर कार्ड वापरत पंडित नेहरुंच्या धोरणावर टीका केली होती.
आज या राज्यातील एका सभेत बोलताना शहा म्हणाले की, जवाहरलाल नेहरू यांनी आणलेले कलम 370 रद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने रद्द करून काश्मीर पुर्णपणे भारतात विलिन करून घेतला.
हिमाचल प्रदेशच्या सिरमौर जिल्ह्यात भाजपच्या निवडणूक रॅलीला शहा संबोधित करत होते.काश्मीरला विषेश राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द होईल असे तुम्हाला कधी वाटले होते का असा सवाल अमित शहा यांनी उपस्थितांना विचारला. पण मोदीजींनी ते करून दाखवले,असे ते म्हणाले.
ऑगस्ट 2019 मध्ये, केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला आणि जम्मू-काश्मीर या सीमावर्ती राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले. यावेळी अमित शहा यांनी राज्यातील भाजप सरकारने केलेल्या कामांचाही आढावा घेत भाजपला पुन्हा विजयी करण्याचे आवाहन केले.