दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आता सर्वकाही आलबेल आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या काही दिवसांपासून हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर येण्याचे टाळत आहेत.
विशेष म्हणजे, रविवारी दिवसभर दोन्ही नेत्यांचे एकत्रित कार्यक्रम होते; परंतु हे नेते एकत्रित कार्यक्रमास उपस्थित राहिले नाही. त्यामुळे राजकीय क्षेत्रात अनेक चर्चांना उधाण सुरू झाले आहे.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे रविवारी दिवसभरात तीन कार्यक्रम एकत्रित होते. मात्र, एकाही कार्यक्रमाला दोघे एकमेकांसमोर आले नाहीत. राजभवनावरील कार्यक्रमाला जाणं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाळत थेट ठाणे गाठले. ठाण्यात काही पक्षप्रवेश असल्याचे सांगून दिवसभर एकनाथ शिंदे ठाण्यातच होते.
दरम्यान, देवेंद्र फडणवीसही ठाण्यात होते. ठाण्यातील भागवत कथा आणि बंजारा समाजाच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. आता देवेंद्र फडणवीस ठाण्यात असताना एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला येतील अशी अपेक्षा होती; परंतु जोपर्यंत देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात आहेत तोपर्यंत एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली नाही. त्यामुळे नेमकं बिनसले काय याची चर्चा सुरू आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षा या निवासस्थानी बैठक झाली. यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यावरून चर्चा झाल्याची माहिती आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे एकमत होत नसल्यामुळे अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या आणि याच नाराजी नाट्यामुळे शिंदे आणि फडणवीस एकाच व्यासपीठावर येण्याचं टाळतात का, असा सवाल विचारला उपस्थित केला जात आहे.
=====================
राज्यात शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार येऊन शंभर दिवस लोटले आहेत. मात्र, अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि मुख्यमंत्र्यांनी वेळ न पाळण यावरून देवेंद्र फडणवीस हे शिंदे यांच्या कारभारावर नाराज असल्याचे सांगितले जाते. आता शिंदे आणि फडणवीस यांच्यातील ही दरी कमी होणार की वाढणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे.
====================