दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा–
मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थक खासदारांपैकी एका खासदाराने आपल्या जीवाला धोका असल्याचे पत्र पोलीस महासंचालकांना लिहिले आहे. त्यातही धक्कादायक बाब म्हणजे विचारे यांनी शिंदे-फडणवीस सरकारपासूनच त्यांना धोका असल्याचे पत्रात म्हटले आहे.
खासदार राजन विचारे यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे पत्र महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पाठवले असून आपली पोलीस सुरक्षा कमी करण्यात आली असून जीवाचे काही बरं वाईट झाल्यास त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील असेही विचारे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांना विचारे यांनी पाठवलेल्या पत्रामध्ये सध्या सूडबुद्धीने राजकारण केले जात असून ठाकरे समर्थक कार्यकर्त्यांविरोधात खोट्या केसेस नोंदवल्या जात असल्याचा आरोप केला आहे. स्वत:ला ठाणे जिल्हाप्रमुख समजणाऱ्या नरेश म्हस्के यांच्या निर्देशावरुन हे सर्व होत असल्याचा आरोपही विचारे यांनी केला आहे.
‘माझ्या अंगरक्षक पोलीस संरक्षणात कपात केल्याबाबत’ या विषयाअंतर्गत विचारे यांनी पत्र लिहिले असून पत्राचा संदर्भात यापूर्वी दिलेल्या पत्राशी जोडण्यात आला आहे. “महाराष्ट्र शासनाकडून होणाऱ्या दडपशाहीबाबत आम्ही आपणस दिनांक १३ ऑक्टोबर २०२२ रोजी दिलेले पत्र” असे सुरुवातीला विचारे यांनी पत्रात संदर्भ देताना म्हटले आहे.