दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : यावर्षी जून ते ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात 12 लाख 49 हजार 731 हेक्टरचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता.
दरम्यान यातून सावरत असतानाच सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पुन्हा झालेल्या अतिवृष्टीमुळे उरल्यासुरल्या पिकांचे देखील नुकसान झाले आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर या दोन महिन्यात मराठवाड्यात 17 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, ज्याचा 28 लाख 76 हजार 816 शेतकऱ्यांना फटका बसला आहे. तर यासाठी 2479 कोटींची मदत अपेक्षित आहे.
यावर्षी मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान केले आहे. मराठवाड्यात 727 मिमी पाऊस अपेक्षित असताना, यंदा 911 मिमी पाऊस झाला. म्हणजेच अपेक्षित सरासरीच्या 125 टक्के पाऊस झाला आहे. मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका कापूस, सोयाबीन, मका, फळपिकांना बसला आहे. यंदा सोयाबीनचे पेरणी अधिक झाली होती. पण सोयाबीन काढणीला आला असतानाच परतीच्या पावसाने झोडून काढले. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे सरकराने भरीव मदत देण्याची मागणी शेतकरी करत आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान
औरंगाबाद जिल्ह्यात 6 लाख 79 हजार 56 शेतकऱ्यांचे 4 लाख 43 हजार 943 हेक्टर शेतीचे नुकसान झाले.
बीड जिल्ह्यात 7 लाख 87 हजार 799 शेतकऱ्यांचे 4 लाख 78 हजार 327 हेक्टर शेतीचे नुकसान झाले.
जालना जिल्ह्यात 5 लाख 67 हजार 826 शेतकऱ्यांचे 3 लाख 88 हजार 922 हेक्टर शेतीचे नुकसान झाले.
परभणी जिल्ह्यात 4 लाख 61 हजार 407 शेतकऱ्यांचे 2 लाख 19 हजार 105 हेक्टर शेतीचे नुकसान झाले.
हिंगोली जिल्ह्यात 54 हजार 876 शेतकऱ्यांचे 12 हजार 360 हेक्टर शेतीचे नुकसान झाले.
नांदेडच्या 49 हजार 885 शेतकऱ्यांचे 21 हजार 500 हेक्टर शेतीचे नुकसान झाले.
लातूर जिल्ह्यात 16 हजार 948 शेतकऱ्यांचे 14 हजार 942 हेक्टर शेतीचे नुकसान झाले.
उस्मानाबाद जिल्ह्यात 2 लाख 59 हजार 19 शेतकऱ्यांचे 1 लाख 91 हजार 579 हेक्टर शेतीचे नुकसान झाले.