दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
५ रु पासून ते ३० रु पर्यंत झाली होती भाडेवाढ
जव्हार:-कोरोनाच्या दोन वर्षाच्या जागतिक महामारीच्या संकटानंतर राष्ट्रीय सण दिवाळी हा जव्हार तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा केला गेला.परंतु या दरम्यान महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटीने दरवाढ केल्याने प्रवाशांत नाराजीचा सूर उमटला होता, परतीच्या पावसाचा फटका,वाढलेली महागाई,धान खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब या सगळ्या गोष्टी एकत्रच आल्याने जव्हार सारख्या ग्रामीण आदिवासी भागातील नागरिकांचे पार कंबरडे मोडले.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने २१ ऑक्टोंबर ते ३१ ऑक्टोबरपर्यंत या दहा दिवसांकरता तिकीट दरात हंगामी भाडेवाढ केली होती.या निर्णयामुळे प्रवासादरम्यान पाच ते ३० रुपये अधिक मोजण्याची वेळ प्रवाशांवर आल्याने वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना ऐन दिवाळीतच एसटीचा प्रवास महागला होता.एसटी महामंडळाच्या पालघर विभागाच्या जव्हार आगारातून ठाणे,पुणे,पंढरपूर, धुळे,नाशिक,पालघर,कल्याण आणि मोखाडा व विक्रमगड तालुक्याच्या ग्रामीण भागात खेडोपाडी एसटी धावते.सुखकर प्रवासासाठी सध्या एसटी बसेसची सुविधा तिन्ही तालुक्यात सुरु आहे.
तालुक्यात एसटीचा प्रवास सर्वसामान्यांना परवडण्यासारखा असल्याने मोठ्या संख्येने प्रवासी एसटीतूनच प्रवास करीत आहेत. मात्र ऐन दिवाळीत एसटीच्या तिकिटात हंगामी वाढ करण्यात आल्याने ५ रुपयांपासून ३० रुपयांपर्यंत एसटी बसेसच्या तिकीटात वाढ झाली होती.त्यामुळे प्रवाशांना ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवास करताना अधिकचे पैसे मोजण्याची वेळ आली होती.परंतु हंगामी भाडेवाढीची दहा दिवसांची मुदत ३१ ऑक्टोंबरला संपत असून १ नोव्हेंबर पासून प्रवाशांना आपले प्रवासाचे नियमित भाडे देऊन प्रवास करता येणार असल्याने प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.