दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली: बलात्कार प्रकरणात टू फिंगर टेस्टवर सुप्रीम कोर्टाने बंदी घातली आहे. अशा प्रकारे कुणी चाचणी करत असेल तर, संबंधितांना दोषी ठरवून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
बलात्कार आणि हत्येच्या एका प्रकरणात निर्णय देताना न्या. चंद्रचूड यांनी टू फिंगर टेस्टवर बंदी घालतानाच, असं करणाऱ्यांना दोषी ठरवून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
टू फिंगर टेस्ट प्रकरणात सुप्रीम कोर्ट म्हणाले की, असं करणाऱ्यांना दोषी मानले जाईल. अजूनही टू फिंगर टेस्ट केली जात आहे ही बाब खेदजनक आहे. न्या. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील एका पीठाने निर्णय देताना कठोर टिप्पणी केली आहे. या कोर्टाने बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणात अशा प्रकारच्या चाचणीवर वारंवार आक्षेप नोंदवला आहे. अशा प्रकारच्या चाचणीला कोणताही वैज्ञानिक आधार नाही, असेही खंडपीठाने म्हटले आहे.
न्या. चंद्रचूड यांनी या प्रकरणात कठोर टिप्पणी करताना म्हटले की, टू फिंगर टेस्ट करणाऱ्यांवर खटला चालवला जाईल. अशा प्रकारच्या चाचणीमुळं पीडितेवर पुन्हा मोठा आघात होतो. मेडिकल कॉलेजच्या अभ्यासक्रमातून अशा प्रकारच्या चाचण्या रद्द करण्याचे आदेश देतानाच बलात्कार पीडितेची अशा प्रकारची चाचणी करणे म्हणजे तिच्यावर मोठा आघात असतो. यावेळी सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा आरोपीला मुक्त करण्याचा निर्णय बदलला आणि बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली
सन २०१३ मधील एका प्रकरणात सुप्रीम कोर्टाने टू फिंगर टेस्ट असंवैधानिक असल्याचे म्हटले होते. बलात्कार पीडितेच्या सन्मानाचे हनन करणारी आणि तिला मानसिक आणि शारीरिक वेदना देणारी ही चाचणी असल्याची टिप्पणी केली होती.