दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली:’आयुष्मान भारत’ योजनेंतर्गत देशात एकूण 15.88 कोटी नागरिकांची नोंदणी करण्यात आली असून यापैकी 3.61 कोटी लोकांना मोफत उपचारही मिळाला आहे. गेल्या चार वर्षांत यावर एकूण 45 हजार, 781 कोटी रु.खर्च केले आहेत. या योजनेंतर्गत सर्वात जास्त 3.11 कोटी नागरिक मध्य प्रदेशात नोंदणीकृत असून त्यापैकी 21 लाख रुग्णांना उपचार मिळाले. दुसरीकडे तामिळनाडूत 1.54 कोटी नागरिकांनी आयुष्मान भारत योजनेत नोंदणी केली असून इथे 67 लाख नागरिकांना योजनेंतर्गत उपचार मिळाले आहेत.
योजनेचा लाभ घेणारे 57 टक्के रुग्ण 5 राज्यांतील
तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, गुजरात आणि छत्तीसगढमध्येच ‘आयुष्मान भारत’ योजनेसाठीची 46 टक्के रक्कम खर्च झाली आहे. उपचार करून घेणारे 57 टक्के रुग्ण याच राज्यांतील आहेत. विशेष म्हणजे, सर्वाधिक 6 हजार, 329 कोटी रु. एकट्या गुजरातमध्ये खर्च झाले. तेथे उपचार करून घेणार्या रुग्णांची संख्या 33.23 लाख आहे. ही संख्या कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूच्या तुलनेत कमी आहे. तामिळनाडूत 67.34 लाख रुग्णांवरील उपचारासाठी 5 हजार 424.48 कोटी रुपये खर्च झाले आहेत.