दै.चालू वार्ता,
जव्हार,प्रतिनिधी,
दिपक काकरा,
जव्हार:-महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाच्या सेवेत विलीनीकरण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या बेमुदत संपाचा आजच्या सलग ५ व्या दिवशीही सुरूच असून शासन आणि एस-टी कर्मचारी यांच्यात काहीही तोडगा न निघाल्याने संप चालूच आहे.या एस-टी संपाचा सर्वाधिक फटका ग्रामीण प्रवाशांना बसत असून खाजगी वाहनाने या ग्रामीण भागातील प्रवाशांना प्रवास करवा लागत आहे. एस-टी च्या तिकिटापेक्षा खाजगी वाहनांना जास्त भाडे आकारणी असल्याने ग्रामीण प्रवाशांना जास्तीचे पैसे देऊन प्रवास करावा लागत आहे.एरवी जव्हार बसस्थानक आवारात प्रवाशांची मोठी वर्दळ असायची परंतु गेल्या ५ दिवसापासून कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे जव्हार बसस्थानक परिसर शुकशुकाट पहावयास मिळत आहे.खेडोपाड्यातील प्रवाशांना खरेदीसाठी ये-जा करण्यासाठी खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून जव्हार सारख्या ग्रामीण आदिवासी भागातील दऱ्याखोऱ्यात दळणवळणाची सुविधा ही मुख्यतः एस-टी महामंडळाकडून पुरवली जाते.”गाव तिथे बस” या महामंडळाच्या ब्रीद वाक्याप्रमाणे ग्रामीण खेडोपाडी आणि तालुक्याचे शहर या लालपरीने जोडण्याचे काम केले आहे.परंतु गेल्या पाच दिवसांपासून आपल्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे बस आगारात उभ्या असून लालपरीचे चाक थांबून ग्रामीण प्रवाशांचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत.