दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली – भिन्न देशांमध्ये, सीमेपलीकडील दहशतवादाचा धोका हा जगासमोर सध्याच्या घडीला असलेला सर्वात गंभीर धोका आहे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे.
या संदर्भात आंतरराष्ट्रीय समुदायाने त्वरित आणि दृढ भूमिकेतून हस्तक्षेप करण्याचे आवाहन देखील राजनाथ सिंह यांनी केले. 9 व्या “आसियान’ गटाच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान त्यांनी हे प्रतिपादन केले.
सीमेपलिकडील दहशतवादाबाबत उदासीनता हा काही या समस्येवरील उपाय असू शकत नाही. दहशतवादाचा फटका जगभरात सर्वांनाच बसला आहे, असे सांगून राजनाथ सिंह यांनी दहशतवादी गटांनी सर्व खंडांमध्ये आधुनिक जगातिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संपर्काचे जाळे कसे तयार केले जाते, दहशतवादी गटांना निधीचे हस्तांतरण कसे केले जाते आणि भरती प्रक्रिया कशी राबवली जाते, यावर प्रकाश टाकला. नव्या तंत्रज्ञानाच्या वापराने सायबर गुन्हेगारीचे रुपांतरण संघटित सायबर हल्ल्यांमध्ये होऊ लागले आहे, असेही ते म्हणाले.
दहशतवादी कारवायांसाठी नव्या तंत्रज्ञानाच्या वापराला विरोध करण्याचे उद्दिष्ट गेल्या महिन्यात दिल्लीत झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने दिल्ली जाहिरनाम्याद्वारे स्विकारलेले आहे, असेही राजनाथ सिंह यांनी सागितले.
जरी दहशतवाद हे सर्व जगापुढील सर्वात मोठे आव्हान असले तरी कोविड-19 नंतर उद्भवलेल्या परिस्थितीकडेही दुर्लक्ष करता येऊ शकत नाही. सध्याच्या भूराजकीय संघर्षामुले अन्न सुरक्षा आणि ऊर्जा सुरक्षेकडेही जगाचे लक्ष वेधून घेतले आहे, असेही राजनाथ सिंह म्हणाले.