दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : येत्या 1 डिसेंबरपासून भारतात होणार्या G-20 जागतिक संमेलनाचे अध्यक्षपद ही आमच्यासाठी मोठी संधी आहे. या संधीचा पुरेपूर वापर करून भारताला विश्व कल्याणावर लक्ष केंद्रित करावे लागेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात सांगितले.
जी मुले एकेकाळी कागदी विमाने हाताने उडवत असत,चंद्र तारे यांची कल्पना केवळ चित्रे रेखाटून करत, त्यांना आता “विक्रम-एस” या नवीन स्वदेशी स्पेस स्टार्ट-अपच्या भारतातच विमान बनवण्याची संधी मिळत आहे, असेही त्यांनी सांगितले.मन की बातचा हा ९५ वा भाग होता. कालच्या या रेडिओ कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी भारतात होणाऱ्या जी 20 परिषदेचा ठळक उल्लेख केला. पंतप्रधान मोदींनी देशातील तरुणांना जी 20 परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
मोदी म्हणाले की, येत्या 1 डिसेंबरपासून एवढ्या मोठ्या गटाचे, एवढ्या शक्तिशाली गटाचे अध्यक्षपद भारत भूषवणार आहे. जी-20 देशांची भागीदारी जगाच्या लोकसंख्येच्या दोन तृतीयांश, जागतिक व्यापाराच्या तीन चतुर्थांश आणि जागतिक जीडीपीच्या 85 टक्के इतकी आहे. शांतता असो वा एकता, पर्यावरणाीय संवेदनशीलतेपर्यंत किंवा शाश्वत विकासापर्यंत भारताकडे या आव्हानांवर उपाय आहेत. आम्ही या परिषदेसाठी “एक जग, एक कुटुंब आणि एक भविष्य” ही थीम दिली आहे. ती ‘वसुधैव कुटुंबकम’ या भारतीय आदर्शाची द्योतक आहे.
पंतप्रधानांनी देशवासीयांना, विशेषत: तरुणांना जी -20 मध्ये मोठ्या प्रमाणावर सामील होण्याचे आवाहन केले. त्यांनी शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांना या जागतिक परिषदेवर चर्चा, वादविवाद आणि इतर स्पर्धा आयोजित करण्याचे आवाहन केले.
विक्रम-एस नवीन युगाची पहाट !
स्वदेशी स्पेस स्टार्ट-अपच्या विक्रम-एस या खासगी क्षेत्रातील रॉकेटने ऐतिहासिक उड्डाण करताच प्रत्येक भारतीयांचे मस्तक अभिमानाने उंचावले, असे पंतप्रधान म्हणाले. हे भारतातील खासगी अवकाश क्षेत्रासाठी एका युगाची पहाट दर्शवते. देशात आत्मविश्वासाने भरलेल्या नव्या युगाची ही सुरुवात आहे. तुम्ही कल्पना करू शकता, जी मुले एकेकाळी कागदी विमाने हाताने उडवत असत,चंद्र तारे यांची कल्पना केवळ चित्रे रेखाटून करत, त्यांना आता भारतातच विमान बनवण्याची संधी मिळणार आहे.
अध्यात्मिक अनुभव !
आपण सारे “मन की बात” कार्यक्रमाच्या शताब्दीकडे वेगाने वाटचाल करत आहोत असे सांगून मोदी म्हणाले की, हा कार्यक्रम माझ्यासाठी 130 कोटी देशवासीयांशी जोडण्याचे आणखी एक माध्यम आहे. प्रत्येक एपिसोडच्या आधी खेड्यापाड्यातून आणि शहरांमधून आलेली पत्रे वाचणे, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंतचे ऑडिओ संदेश ऐकणे, हा माझ्यासाठी एक आध्यात्मिक अनुभव आहे, अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली.