दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी माकणी
गणेश विठ्ठलराव मुसांडे
लोहारा : तालुक्यातील अनेक तलाठी मुख्यालयी राहत नसल्याने जनतेची कामे होत नसल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते सय्यद अजीज फजल यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
लोहारा तालुक्यातील तलाठी मुख्यालयी राहत नसल्याने जनतेची कामे योग्य रित्या होत नसल्याने शेतकऱ्यांच्या असंख्य तक्रारी निर्माण होत आहेत.
तलाठी मुख्यालयी राहत नसल्याने कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना नाविलाजाने मानसिक व आर्थिक त्रास सोसून तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. मुख्यालयी राहणे बंधनकारक असताना तलाठी यांचेकडून शासनाच्या नियमांची उघडउघड पायमल्ली होत असून याचा त्रास जनतेला भोगावा लागत आहे. सज्जाच्या ठिकाणी कार्यालयात कामे होणे गरजेचे असताना सुद्धा अनेक तलाठ्यांनी आपली कार्यालये मनमानी करून लोहारा शहरात थाटली आहेत हे नियमबाह्य आहे. यामुळे गोरगरीब शेतकऱ्यांना दिवसेंदिवस तालाठीच सापडत नाही. त्यामुळे सध्या किरकोळ कामासाठी सुद्धा दोन – चार दिवस लागतात. जरी भेट झाली तरी योग्य मार्गाने काम न करता चिरीमिरी साठी कामात अडथळे आणले जातात याच्या असंख्य तक्रारी आमच्याकडे पुराव्यानिशी उपलब्ध आहेत.
अनेक तलाठी बाहेरच्या जिल्ह्यात राहत आहेत. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तालुक्यात येऊन कामकाज पाहतात. त्यामुळे त्यांची चौकशी करून तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुराव्यानिशी आमरण उपोषण करण्यात येईल. असेही निवेदनात म्हटले आहे.