दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक -मोहन आखाडे
‘रोटेगाव ते औरंगाबाद दरम्यान रेल्वे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झालेले आहे. पुढील टप्प्यात औरंगाबाद ते जालना दरम्यान काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. नांदेड विभागाअंतर्गत येणाऱ्या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरणाचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणार आहे,’ अशी माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांत डिझेलचे दर वाढलेले आहे. याचा फटका रेल्वे विभागाला सोसावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या विद्युतीकरणाला गेल्या काही वर्षांपासून वेग देण्यात आलेला आहे. यात अंकाई ते रोटेगाव दरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे. रोटेगाव ते औरंगाबाद मार्गावर विद्युतीकरण पूर्ण झालेले आहे. या मार्गाची पाहणी करण्यात आलेली आहे. औरंगाबाद मार्गासह नांदेड विभागातंर्गत येणाऱ्या अन्य मार्गावर विद्युतीकरणाचे काम सुरू आहे.
नांदेड विभागात एकूण चार मुख्य मार्गावर विद्युतीकरणाचे काम हाती घेण्यात आलेले आहेत. यात परभणी ते परळी, अकोला ते पूर्णा , मुदखेड ते मनमाड आणि आदिलाबाद ते मुदखेड या मार्गाचा समावेश आहे. सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये अकोला- हिंगोली, मनमाड- रोटेगाव आणि आदिलाबाद ते हिमायतनगर या मार्गावर विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित काम डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
रेल्वे विभागाने नांदेड विभागात रेल्वे विद्युतीकरणाचे काम वेगात सुरू केले आहे. सध्या औरंगाबाद मार्गासह अन्य काही मार्गावर डिझेल इंजिन चालविण्यात येत आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत काम पूर्ण झाल्यास, वर्ष २०२४ मध्ये औरंगाबाद मार्गासह नांदेड विभागातील अन्य मार्गावर डिझेल इंजिनची सेवा खंडीत केली जाणार असल्याचे संकेत रेल्वे विभागाकडून देण्यात आले आहे.