
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मराठी भाषा ही इंडो-युरोपीय भाषाकुळातील एक भाषा आहे. मराठी ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, भारतात मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या सुमारे ९ कोटी आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे. मराठी भाषा भारताच्या प्राचीन भाषांपैकी एक असून महाराष्ट्री प्राकृतचे आधुनिक रूप आहे. मराठीचे वय सुमारे २२०० वर्ष आहे. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून मराठी भाषेला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. आजतागायत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत आणि त्यात सातत्यपूर्ण रीतीने भर पडत आहे.
मराठी भाषिक प्रदेश
मराठी भाषा मुख्यत्वे भारताच्या महाराष्ट्र राज्यात बोलली जाते. त्याचबरोबर गोवा, उत्तर कर्नाटक (बेळगांव, हुबळी-धारवाड, गुलबर्गा, बिदर, कारवार), गुजरात (दक्षिण गुजरात, सुरत, बडोदा व अहमदाबाद), आंध्रप्रदेश (हैदराबाद), मध्यप्रदेश (इंदूर, ग्वाल्हेर), तामिळनाडू (तंजावर) व छत्तीसगढ राज्यांत आणि दमण आणि दीव, दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांतील काही भागातही मराठी बोलली जाते. देशातील 09 राज्ये,4 केंदेशशित प्रदेश आणि ७२ देशांमध्ये मराठी भाषिकांची वस्ती आहे. इतरही अनेक देशांमध्ये मराठी भाषा बोलण्याचे प्रमाण वाढत आहे.
मराठी भाषा भारतासह, फिजी, मॉरिशस व इस्रायल या देशांतही बोलली जाते. त्याचबरोबर जगभरात विखुरलेल्या मराठी-भाषकांमुळे मराठी अमेरिकेची संयुक्त संस्थाने, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, सिंगापूर, जर्मनी, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंड येथेही बोलली जाते.
राजभाषा
भारतीय राज्यघटनेतील २२ अधिकृत भाषांच्या यादीत मराठीचा समावेश आहे. मराठी ही महाराष्ट्र राज्याची एकमेव अधिकृत राजभाषा आहे. गोवा राज्यात कायद्यानुसार कोकणी ही राजभाषा असली तरी मराठीचा वापर शासनाच्या सर्व कारणासाठी होऊ शकतो. शासनाशी मराठीत होणाऱ्या पत्रव्यवहाराचे उत्तर मराठीतच दिले जाते. दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात मराठी एक अधिकृत राजभाषा आहे.
महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांत मराठीच्या उच्च शिक्षणाची सोय आहे तसेच महाराष्ट्राबाहेरील गोवा विद्यापीठ (पणजी), महाराजा सयाजीराव विद्यापीठ (बडोदे), उस्मानिया विद्यापीठ (तेलंगण), गुलबर्गा विद्यापीठ, देवी अहिल्या विद्यापीठ (इंदूर) व जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय (नवी दिल्ली)येथे मराठी उच्चशिक्षण विभाग आहेत. महाराष्ट्राबाहेरील एकूण १५ विद्यापीठांमध्ये मराठी शिकविली जाते.
प्रमाणभाषा
प्रमाणभाषा ही एक बोली भाषाच असते. तथापि त्याचे नियम पक्के बांधलेले आणि मान्यताप्राप्त असतात. यामुळे सर्वत्र एकाच प्रकारचे लेखन केले जाते आणि त्यामुळे भाषा वाढीस त्याचा उपयोग होतो. यास मानक भाषा अथवा प्रमाण भाषा असेही म्हंटले जाते. भाषेचे मानकीकरण ही एक निरंतर प्रक्रिया आहे. भाषा प्रमाणीकरण प्रक्रिया स्थिर करण्यासाठी प्रयत्न केले जावे लागतात. मानक भाषा हा समाजात वापरल्या जाणाऱ्या बोलल्या जाणाऱ्या आणि लिखित संप्रेषणांमध्ये व्यापकपणे ओळखल्या जाणाऱ्या परंपरांचा संग्रह असतो. मराठी साहित्य महामंडळाने पाठवलेल्या लेखनविषयक नियमांची यादी इ.स. १९७२ मध्ये महाराष्ट्र शासनाने मान्य केली. त्यात आणखी चार नियमांची भर घालण्यात आली. महाराष्ट्र शासनाने ते नियम मान्य करून मराठी प्रमाणभाषेचे लेखन या नियमांनुसार करावे आणि ते त्वरित अंमलात आणावेत, असा शासकीय आदेश काढला आहे. मराठी भाषेमध्ये त्या नियमांनुसार मानक भाषा मराठीचे लेखन केले जाते. औपचारिक लेखन करतांना मराठी प्रमाणभाषा वापरली जाते. औपचारिक व ग्रांथिक लेखनासाठी सर्वमान्य अशी प्रमाणभूत मराठी भाषा असणे आवश्यक असते. औपचारिक लेखन म्हणजे वैचारिक, वैज्ञानिक, शास्त्रीय लेखन, ललितेतर साहित्य, रस्त्यावरच्या सूचना फलक, वर्तमानपत्र बातम्या, संपादकीय, मासिकातील लेख, शासकीय पत्रव्यवहार इत्यादी लेखनात प्रमाणभाषेचाच वापर करणे आवश्यक आहे.याशिवाय व्याख्याने आणि परिसंवादांमध्ये प्रमाणभाषेचाच वापर केला गेला जातो. प्रमाण भाषा म्हणजे एकसारखी भाषा वापरल्याने भाषेला स्थिरता येते.
प्रमाणभाषा महत्त्व आणि उपयोग
एका प्रकारे लिहिलेल्या भाषेला संगणकीकृत शोध घेतांना प्रमाणभाषा वापरलेली असेल तर त्याचा उपयोग होतो आणि योग्य ते लेखन सर्च इंजिनास सापडते. अन्यथा प्रत्येक वेळी निराळा शोध देत बसावे लागेल आणि इतके करूनही सर्व माहिती मिळाली असे म्हणता येणार नाही. तसेच कायदे विषयक लेखन करतांना एकाच प्रकारच्या भाषेमध्ये करणे आवश्यक आहे. अन्यथा कायद्याचा अर्थ लावणे अशक्य होईल. याच प्रमाणे वैद्यकीय क्षेत्रात कोणतेही निदान करणे अवघड होईल. कारण एकाच रोगासाठी डॉक्टर अनेक शद्ब वापरू लागले तर रुग्णास नक्की काय होते आहे याचे निदान करून त्याची औषधे मिळवणे शक्य होणार नाही. यामुळे मानक भाषेचा वापर करणे अतिशय आवश्यक आहे. एकच भाषा वापरल्याने सामायिक मराठी संस्कृती स्थापित होते आणि आम्ही मराठी आहोत असे म्हणत येते. असा भाषेचा उपयोग चीन मध्ये झालेला दिसून येतो. चीन मध्ये अनेक बोली भाषा होत्या पण एकच प्रमाणित चीनी भाषा ही मानक भाषा म्हणून लागू केल्याने सर्व चीनी लोक एकमेकांशी जोडले गेले आहेत. तसेच इस्राएल देशा मध्ये हिब्रू भाषा संवर्धनात मानक भाषा वापरल्याने हिब्रू भाषा समर्थ झाली आणि आज एकेकाळी मृत झालेलेल्या भाषेत आज शास्त्रीय संशोधने प्रकाशित होत आहेत. याच प्रमाणे मराठी भाषेत लेखन करतांना अथवा संशोधन निबंध प्रकाशित करण्यासाठी व्याकरणाचे शासकीय नियम असलेली मराठी भाषा वापरणे आवश्यक आहे.
मराठी भाषा दिवस
मराठी भाषा दिन
१ मे हा दिवस महाराष्ट्र दिन किंवा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. याखेरीज विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.
मराठी पुस्तके
‘लीळाचरित्र’ हा महान ग्रंथ म्हाइंभटांनी लिहून मराठी भाषेचा पाया रोवला. मराठी भाषेत आजवर विविध विषयांवर विस्तृत लेखन प्रकाशीत झाले असून , त्यातील कैक प्रकाशने जागतिक साहित्यात मानाचे स्थान मिळवू शकतील अशी आहेत. मराठीत दरवर्षी दोन हजार नवीन पुस्तके प्रकाशित होतात व सुमारे ५०० दिवाळी अंक प्रसिद्ध होतात. नामवंत खासगी प्रकाशन संस्था आणि सरकारी प्रकाशने यांची वार्षिक उलाढाल, तसेच पाठ्यपुस्तके धार्मिक, ललित आणि वैचारिक ग्रंथ यांची एकत्रित बाजारपेठ सुमारे २५० कोटी रुपयांपर्यंत आहे. सरकारी संस्था ’बालभारती’ दरवर्षी सुमारे ९ कोटी पुस्तके छापते. भारताच्या सर्वाधिक खपाच़े मासिक ’लोकराज्य’ हे आणि देशातले सर्वाधिक खपाचे च़ौथ्या क्रमांकाच़े वर्तमानपत्र ’लोकमत’ हे आहे. देशभरातील एकूण ग्रंथालयांतली २५ टक्के ग्रंथालये एकट्या महाराष्ट्रात आहेत.
शब्दार्थ कोशांव्यतिरिक्त मराठी भाषेत अर्वाचीन चरित्र कोश, प्राचीन चरित्र कोश (सिद्धेश्वरशास्त्री चित्राव), तत्त्वज्ञानकोश, तुलनात्मक भाषा विज्ञान (भोलानाथ तिवारी+उदय नारायण तिवारी+पांडुरंग दामोदर गुणे) वाङ्मयकोश, विश्वकोश, समाजविज्ञान कोश, सरिता कोश, संस्कृती कोश, स्थलकोश, ज्ञानकोश (श्रीधर व्यंकटेश केतकर), असे अनेक प्रकारचे कोश मराठीत आहेत. या बाबतीत मराठी भाषेचा जगात दुसरा क्रमांक लागतो.
मराठी भाषेचा इतिहास
मराठी भाषेचा इतिहास
मराठी भाषेचा उदय प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला, असे बहुतांशी मानले जाते. पैठण (प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली. मराठी ही भाषा देवनागरी लिपी वापरून लिहिली जाते. इ.स. १२७८ मध्ये म्हाइंभट यांनी लीळाचरित्र लिहिले. त्यानंतर इ.स. १२९० मध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली. महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात मौलिक भर घातली. संत एकनाथ यांनी या भाषेत भारुडे लिहिली आणि एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आदि ग्रंथांची भर घातली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि पेशव्यांनी या साम्राज्याचा विस्तार केला. त्यानंतर मराठी भाषेस राजाश्रय मिळाला. इ.स. १९४७ नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत राज्यभाषेचा दर्जा दिला. इ.स. १९६० मध्ये मराठी भाषिकांच्या एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला.
राजा केसिदेवरायच्या कारकिर्दीत कोरलेला अक्षी शिलालेख हा आजवर सापडलेला मराठी भाषेतील पुराणतम शिलालेख आहे . अक्षी शिलालेखाच्या शोधापूर्वी कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या उंच मूर्तीच्या पायाशी मराठीत कोरलेला लेख – “चामुण्डराजे करवियले” हा आद्य मराठी लेख समजला जात असे. अक्षी हे गाव महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अलिबागपासून दक्षिण दिशेस ५ कि.मी. अंतरावर अलिबाग- मुरुड जंजिरा रस्त्यावर आहे. या शिलालेखाचा उल्लेख इ.स. १८८३च्या कुलाबा गॅझेटियरमध्ये आहे. त्या शिलालेखावरील वरील मजकूर खालीलप्रमाणे –
गी सुष संतु । स्वस्ति ओं । पसीमस-
मुद्रधीपती ।श्री कोंकणा चक्री-
वर्ती । स्री केसीदेवराय । महाप्रधा-
न भइर्जु सेणुई तसीमीनी काले
प्रव्रतमने । सकु संवतु : ९३४ प्रधा-
वी संवसरे: अधिकु दिवे सुक्रे बौ-लु । भइर्जुवे तथा बोडणा तथानौ
कुंवली अधोर्यु प्रधानु । महलषु-
मीची वआण । लुनया कचलीज
हा लेख एका ओबडधोबड शिळेवर कोरला असून त्या शिळेचा माथ्यावर चंद्रसूर्य आणि मजकुराखाली गद्धेगाळ(?) व शेवटी पुन्हा चंद्रसूर्य असे कोरीवकामाचे स्वरूप आहे. लेख देवनागरी लिपीत असून भाषा संस्कृत व मराठी मिश्र आहे. इंग्रजी काल गणनेनुसार या लेखाची तारीख १६ मे सन १०१२ अशी आहे.
अर्थ : “जगी सुख नांदो. ओम पश्चिम समुद्राधीपती श्री कोकण चक्रीवर्ती श्री केसिदेवराय यांचा महाप्रधान भइर्जु सेणुई याने शक संवत ९३४ परिधावी संवत्सर अधिक मासात शुक्रवारी वद्यपक्षात देवीचा बोढणासाठी नऊ कुंवली धान्य दान केले.” लुनया हे लेख कोरणाऱ्याचे नाव आहे.
कुडल संगम, ता. दक्षिण सोलापूर येथील मराठी शिलालेख – “वाछि तो विजेया होईवा ।।’ कुडल शब्द कन्नड असून त्याचा अर्थ संगम आहे. भीमा व सीना या दोन नद्यांचा संगमावर वसलेल्या या गावात चालुक्यकालीन संगमेश्वर मंदिर आहे. त्याची स्थिती बऱ्यापैकी असून तेथील सभामंडपातील तुळईवर अडीच़ ओळींच़ा लेख कोरलेला आहे. त्याच़ा काही भाग संस्कृत काही भाग मराठी आहे. शेवटच़े वाक्य “वाछि तो विजेया होईवा ।।’ असे मराठीत आहे. त्यात काळाच़ा स्पष्ट उल्लेख आहे. तेथे शके ९४० असे कोरले आहे. साधारणतः इ.स. १०१८ या काळात तो कोरला गेला असावा. श्रवणबेळगोळच्यानंतर दिवे आगार ताम्रपटाच़ा शोध लागला. त्याच़ा काळ शके ९८२(इ.स. १०६०) होता. त्यानंतर कुडलचा शिलालेखाच़ा शोध लागला.
डि एस लोखंडे पाटील
संपादक – दै चालु वार्ता