दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
आपला देश विविध परंपरणे नटलेला असुन प्रत्येक सणाला फार महत्व देतात त्यातील होळी हा सण द्वेष, क्लेश काढून मन निर्मळ करणारा सण आहे तोंड गोड केल्याशिवाय कुठलाही भारतीय सण पूर्ण होत नाही. होळीच्या सणाला गाठींचे खास महत्त्व आहे. गेल्या काही वर्षांमध्ये गाठीची विक्री कमी होत असली तरी शहरातील दुकाने सध्या पांढऱ्याशुभ्र गाठ्यांनी सजली आहेत.
होळीपूजन गाठीशिवाय अपूर्ण असते. नवीन लग्न झाल्यावर वधूमंडळी वरास गाठीची भेट देतात. शिवाय, शेजाऱ्यांना, आप्तांनाही गाठींच्या माळा देण्याची पद्धत आजही पाळली जाते. पांढऱ्याशुभ्र गाठी घालून मिरवण्याची बच्चेमंडळीना खूप हौस असते. होळीला पूरणपोळी, रंग, गुलाल, पिचकारी याचे जसे महत्त्व आहे तोच गाठीचाही मान आहे. त्यामुळे होळीला घरोघरी गाठीची खरेदी होतेच. ज्यांच्याकडे लहान मुले आहेत तिथे खाऊ म्हणून होळीला गाठी पाठवतात शिवाय लग्न जमलेल्या वधूला मान म्हणून गाठीचोळी पाठवतात कोणत्या ना कोणत्या निमित्ताने गाठीची खरेदी होतेच. गुढीपाडव्याला पूजेत वापरतात. त्यासाठी म्हणून गाठी घेतात. यंदा तर गाठीच्या भावात थोडी फार वाढ झाली असल्यानेही विक्री मंदावल्याचे चित्र आहे.मंठा शहरातील भोई गल्ली परिसरात गाठी तयार करणारे पारंपरिक कारखाने आहेत. होळीच्या दिवसापर्यंत तिथे गाठी तयार होते. मात्र, मागील काही वर्षांपासून गाठीची विक्री घटत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. भारतीय सण, उत्सव आणि ते साजरे करण्याच्या पद्धतीला शास्त्रीय कारणे आहेत. गाठी घरोघरी देवून सामाजिक सलोखा कायम राहावा, हा उद्देश असावा. शिवाय, आरोग्याच्या दृष्टीने गाठीचे महत्त्व आहे.
*🎆(चौकट )नव्या पिढीला गाठीचा खाऊचे महत्व वाटेना* आधुनिक तंत्रज्ञानाच्या सानिध्यात वावरत असलेल्या नव्या पिढीला गाठीचे महत्त्व तितकेसे वाटत नसावे, असे दिसून येते. फास्ट फूडची क्रेझ असणाऱ्या सध्याच्या चिमुकल्यांच्या गळ्यात होळीला गाठी विरळच दिसून येते, हेदेखील विक्री कमी होण्यामागील एक कारण असू शकते. शिवाय, आजकाल संदेश पाठवून शुभेच्छा देण्याचा प्रघात आहे. डिजिटल जगात समाज माध्यमांचा वापर वाढला असून ते मोठ्या प्रमाणात प्रभावी ठरतात. होळी सणाचे संदेश मोबाइलवर खणखणत असताना गाठीचा खाऊ मात्र कुठेतरी हरवणार नाही ना, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये गाठीविक्रीचा व्यवसाय ३० ते ४० टक्क्यांनी कमी झाला आहे. मधुमेहासारखे आजारदेखील याला कारणीभूत आहे. त्याचा व्यवसायावर परिणाम होत आहे सध्या गाठीचा दर 90 ते 100 रु किलो मंठा येथील गाठी उत्पादक संतोष लांडगे यांनी सांगितले आहे.