दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मुंबई : एखाद्या निवडणुकीत निसटता विजय झाला आणि आपण फार मोठा तीर मारला असे समजण्याचे कारण नाही. शिवसेनेची अवस्था काय झाली आहे हे सर्वांना माहिती आहे. सर्वांना त्यांची कीव येते.
पक्ष राहिला नाही, नाव राहिले नाही, कार्यालय नाही, तरी देखील आपला भोंगा सुरु करायचा, असे म्हणत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर देखील जोरदार टीका केली. गिरीश महाजन म्हणाले, संजय राऊत हे महाशय शिवराळ भाषा वापरत आहेत. संजय राऊत हे वाचाळवीर आहेत. त्यामुळे ते तोंडात येईल तसे बडबड करतात. त्यांच्याकडे कुणी लक्ष देत नाही.
एकीकडे विधानसभेत अवैध धंद्यांबाबत लक्षवेधी मांडायची, मोठमोठ्याने भाषणे करायची आणि दुसरीकडे त्यांच्या मतदारसंघात पोलिसांनी छापा टाकला की माझी माणसे आहेत म्हणून पोलिसांना फोन करायचा, पोलिसांना धमकायचे. त्यामुळे खडसे साहेबांचे सर्व पितळ उघड पडत आहे. एकनाथ खडसे यांच्या अनेक चौकशा सुरु आहेत. नेमकी कोणती चौकशी सुरु आहे हे माहित नाही. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यानुसार ती चौकशी सुरु असल्याचे त्यांनी म्हटले आहे.