दैनिक चालु वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : राजर्षि शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करून समाजात समता, बंधुत्व आणि त्यांची शिकवण रुजविण्याचे महत्प्रयासी प्रयत्न राष्ट्रवादीच्या महाप्रबोधन यात्रेतून केले जात आहे. काल परभणीत दाखल या राज्यव्यापी यात्रेचे राष्ट्रवादी भवनात भव्य असे स्वागत करण्यात आले.
राष्ट्रवादीच्या माजी सैनिक सेलच्या वतीने काढण्यात आलेल्या राज्यव्यापी महाप्रबोधन यात्रेत मुंबई उच्च न्यायालयाचे मेडिएटर ॲड.संभाजीराव मोहिते, राष्ट्रवादी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष दीपक शिर्के, सरचिटणीस बाबासाहेब जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत श्री. शिर्के यांनी महाप्रबोधन यात्रेचे उदिष्ट विषद केले तर ॲड. शिंदे यांनी राजर्षि शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण, समता, बंधूभाव आणि तत्कालीन कार्यप्रणालीला ऊजाळा देत मौलिक विचार मांडले. लहान-मोठ्या कारणां वरुन समाजात दुही, तेढ निर्माण करण्यापेक्षा त्यांच्यात समता व बंधुभाव कसा निर्माण होईल यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न लोकाभिमुख असेच होते, असे ॲड. शिंदे यांनी आपल्या मंथनातून व्यक्त केले. राजर्षि शाहू महाराज यांच्या दूरगामी विचारांचे पैलू पुढच्या कित्येक पिढ्यांना उपयुक्त ठरु शकतील असे त्यांचे त्यावेळी असलेले नियोजन विषद केले.
याप्रसंगी परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के, तालुकाध्यक्ष संतोष देशमुख, किसान सेलचे सुरेंद्र रोडगे, माजी सैनिकांसह आदीजन उपस्थित होते. पत्रकारांशी खेळीमेळीत संवाद साधताना प्रदेशाध्यक्ष शिर्के यांनी असेही सांगितले की, राजर्षि शाहू महाराज स्मृती शताब्दी अणि भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव यांचे औचित्य साधून १० फेब्रुवारी रोजी पूणे येथून निघालेली ही महाप्रबोधन यात्रा वीस जिल्हे मार्गक्रमण करीत करीत आज परभणीत दाखल झाली असल्याचे त्यांनी सांगितले. यात्रेत सहभागी मान्यवरांचा यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला.
राज्यभर परिक्रमा करीत असलेली ही महाप्रबोधन यात्रा ९ एप्रिल पर्यंत चालणार असून या यात्रेचा पक्षाचे सर्वेसर्वा तथा खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत समारोप केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
या यात्रेमुळे साडे नऊ लाख माजी सैनिक जोडले जाणार आहेत. उत्स्फूर्तपणे त्यांचाही प्रतिसाद मिळत असून त्यांच्या या प्रतिसादामुळे राष्ट्रवादी कॉग्रेसला भरीव योगदान मिळू शकेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
जिल्हा कार्याध्यक्ष तथा प्रा. किरण सोनटक्के यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात शाहू, फुले, आंबेडकरांच्याच विचाराने राष्ट्रवादी काँग्रेस कार्य करीत असून या महापुरुषांच्या विचारांची समाजाला खरी गरज असल्याचेही त्यांनी सांगितले तर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या या महाप्रबोधन यात्रेला शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांशी प्रेरित समस्त बहुजन समाज जोडला जात असून त्यामुळे ह्या चळवळीला मोठी प्रगल्भता लाभली जात आहे. इतकेच नाही तर त्या महान मान्यवरांचे समाजहित साधणारे ते विचार तळागाळापर्यंत पोहोचविले जाण्याची नितांत आवश्यकता असल्याचे मतही सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष शिर्के यांनी यावेळी प्रगट केले.