दैनिक चालु वार्ता उपसंपादक छत्रपती संभाजीनगर- मोहन आखाडे
हिंदू धर्मामध्ये महत्त्वाचा मानल्या जाणारा सण म्हणजेच होलिका उत्सव प्राचीन परंपरेनुसार आपण हा सण साजरा करतो. या सणाचे महत्व म्हणजे आजच्या दिवशी सर्व बांधव होलिका उत्सवाच्या निमित्ताने वाईट विचारांचे, वाईट प्रवृतीचे दहन करत असतात. दरम्यान यानिमित्ताने पन्नास खोक्याचे प्रतीक असलेल्या होलिकेचं विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडून दहन करण्यात आलं आहे. यावेळी पन्नास खोके एकदम ओक्के अशा घोषणाबाजी देखील देण्यात आल्या.
यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, आजच्या दिवशी वाईट विचारांनी आणि वाईट प्रवृत्तीने पाठीत खंजीर खुपसून स्थापन केलेल्या पन्नास खोके घेऊन मिंधे झालेल्या सरकारच्या वाईट प्रवृत्तीचे दहन करण्यात आले. तर यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मशाल हातात घेऊन होळी पेटवून शिवसैनिकांसमवेत श्री बाबा साई बहुउद्देशीय सेवा भावी संस्थेच्या वतीने आयोजित गद्दार व 50 खोकेचे प्रतीक असलेल्या होलिकेचं दहन करत, होलिका उत्सव साजरा केला.
छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या विरोधात खासदार इम्तियाज जलील यांनी उपोषण सुरु केले आहे. दरम्यान यावरूनच अंबादास दानवे यांनी जलील यांच्यावर टीका केली आहे. मुस्लीम मते आपल्या हातून जातील यामुळेच जलील उपोषणाचे नाटक करत असल्याचे दानवे म्हणाले. तर उपोषणाच्या ठिकाणी बिर्याणीच्या पार्ट्या होत असून, हे सर्व नाटक आहे. तर मुस्लिमांना गुमराह करण्यासाठी नाटक सुरु असल्याचे दानवे म्हणाले. तर याचवेळी त्यांनी शेतकरी आत्महत्यावरून शिंदे-फडणवीस सरकारसह कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर देखील टीका केली आहे.