
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
साईबाबा (१८५६ – १५ ऑक्टोबर, १९१८) एक भारतीय फ़कीर ( संत ) होते. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डी ह्या गांवात त्यांचे वास्तव्य असल्यामुळे त्यांना ‘शिर्डीचे साईबाबा’ म्हणूनही ओळखले जाते. येथूनच बाबांनी सर्वांना श्रद्धा व सबुरी हा महामंत्र दिला. शिर्डीस आल्यावर प्राप्त होणारी मनःशांती व मिळणारा आत्मविश्वास यामुळे शिर्डी हे भारतासह जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे.
साईबाबा हे मोमीन वंशीय मुस्लिम होते असेही मानण्यात येते. ते मशिदीत मुक्कामी राहत आणि नमाज पठण करत असत. त्यांचा परिधान हा कायम पांढऱ्या रंगाचा असे. जेव्हा पहिल्यांदा त्यांना म्हाळसा पतींनी(शिर्डीचा पुजारी) पाहिले तेव्हा साई अशी हाक मारली, कारण त्यावेळी लोक मराठी-उर्दू-फारशी मिश्रित भाषा वापरीत असत, साईचा अर्थ ‘फकीर’ किंवा ‘यवनी संत’ असा आहे. साईबाबांसाठी हिंदू – मुस्लिमांच्यासह सर्व लोक समान होते. त्यांनी धर्मनिरपेक्षतेची शिकवण दिली. “सबका मालिक एक” आणि ” अल्लाह मालिक ” हे साईंचे बोल होते.
साईबाबांच्या जन्मस्थळा विषयी सध्या वेगवेगळी मते मतांतरे आहेत. साईबाबांच्या जन्माविषयी जगभरातुन दावे करण्यात आलेले आहेत. मात्र सर्वमान्य व प्रमाणीत पुरावे सादर करण्यात सर्वांनाच अपयश आलेले आहे. मुळात साईबाबांनी कधीही स्वतःच्या जन्म स्थळाबाबत कुठे उल्लेख केल्याचे आढळून येत नाही.
साईबाबा हे मुस्लिम फकीर नसून ते जन्माने ब्राम्हण होते, त्यामुळे ते हिंदूच आहेत. असा दावा कांदिवलीच्या साईधाम चॅरिटेबल ट्रस्टने सप्टेंबर २०१४ मध्ये उच्च न्यायालयात दाखल केला होता.त्यांचा जन्म परभणी जिल्ह्यातील पाथरी या गावात २७ सप्टेंबर १८३७ रोजी दुपारी सव्वा बारा वाजता झाला, असे त्यांचे म्हणणे आहे. साईबाबांच्या आईवडिलांनी बालपणी त्यांना मुस्लिम फकिराने केलेल्या आग्रहावरून त्यांच्या हवाली केले. पण नंतर त्या फकिराने साईबाबांना वेकुंशा नावाच्या हिंदू गुरूकडे सोपवले. साईबाबा यांचे खरे नाव हरिभाऊ आहे. याबाबत सबळ पुरावे असल्याचा दावाही साईधाम चॅरिटबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आला आहे.
साईबाबांनी भिक्षा मागून उदरनिर्वाह केला. आयुष्यभर त्यांनी सबका मलिक एक हाच उपदेश केला. ते नेहमी अल्लाह मलिक असेही म्हणायचे.
साईबाबांचे भक्त भारतात आणि भारताबाहेरही फार मोठ्या प्रमाणात आहेत. ठिकठिकाणी बाबांची मंदिरे उभारण्यात आली आहेत. त्यांच्या भक्तांच्या म्हणण्यानुसार ते अवतारी पुरुष होते. कुणी त्यांना दत्ताचा अवतार मानत तर कुणी विष्णूचा कुणी शिवाचा. बाबांच्या भक्त समुदायात सर्वच जातीधर्मांच्या लोकांचा समावेश होतो. यामध्ये प्रामुख्याने हिंदू व मुस्लिम धर्मीय आहेत. मुस्लिम धर्मातही सुफी संतांमध्ये साई बाबांना मानाचे स्थान आहे.
जून २०१४ मध्ये द्वारका आणि ज्योतिष पीठाचे शंकराचार्य असलेले जगद्गुरू स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी मात्र साई बाबांच्या पूजेला आपला विरोध दर्शवला. कारण त्यांच्या मतानुसार साई हे ईश्वर वा अवतार नसून एक सर्वसामान्य मनुष्य होते. त्यानंतर शिर्डी व काही ठिकाणी साई बाबांच्या भक्तांनी शंकराचार्यांच्या विरोधात निदर्शने केली.