दैनिक चालु वार्ता उपसंपादक छत्रपती संभाजीनगर- मोहन आखाडे
राज्यात रामनवमी सण आणि सध्या सुरू असलेला रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिस आधीच अलर्टवर होते. परंतु छत्रपती संभाजीनगर येथे घडलेल्या घटनेनंतर आता पोलिस अधिक सतर्क झाले असून खबरदारीच्या उपाययोजना करत आहेत.
सोशल मीडियावर समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टवर पोलिसांची करडी नजर आहे. अशा पोस्ट पोलिसांकडून डिलिट केल्या जात असून त्या पोस्ट टाकणाऱ्यांवर कारवाई केली जात असून राज्य गुप्तचर विभाग आणि विशेष शाखा सतर्क आहेत आणि अशांतता निर्माण करणारी प्रत्येक माहिती गोळा करत असून खबरदारी घेत आहेत.
महाराष्ट्रातील विविध शहरे आणि जिल्ह्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांना अधिक सतर्कता आणि सर्व खबरदारीच्या उपाययोजना करत आहेत. महाराष्ट्र पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, *छत्रपती संभाजीनगर* येथे आधीच अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात फक्त एकच गुन्हा संभाजीनगरमध्ये दाखल झाल्याचे सूत्रांनी सांगितले. तर मुंबईत काल मालवणीत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, सोशल मीडियावरून आक्षेपचे मेसेज आणि इतर मेसेज डिलीट करण्यासाठी महाराष्ट्र पोलिस सायबर पोलिसांची मदत घेत आहेत. सोशल मीडियावरही द्वेषपूर्ण संदेशाचे युद्ध सध्या सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. असे अनेक संदेश आधीच प्लॅटफॉर्मवरून हटवले आहेत अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.