दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मुंबई : गुरुवारच्या तुलनेत आज राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या काहीशी कमी झाली असली तरी धोका कायम असल्याचं दिसून येतंय.
राज्यात आज 425 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे राज्यात आज कुणालाही जीव गमवावा लागला नसून राज्यातील मृत्यूदर हा 1.82 टक्के इतका आहे. राज्यात आज
351 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यात आजपर्यंत एकूण 79,92,580 करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.14 टक्के एवढे झाले आहे.
राज्यात सध्या कोरोनाचे 3090 सक्रिय रुग्ण आहेत. यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 937 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे. त्या खालोखाल पुण्याचा क्रमांक लागत असून पुण्यामध्ये 726 सक्रिय रुग्ण आढळतात. तर ठाण्यामध्ये 566 सक्रिय रुग्ण आढळतात.
देशातील रुग्णसंख्येत वाढ
देशात आज तीन हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे गेल्या सहा महिन्यातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. गेल्या आठवड्यापर्यंत देशात दररोज सरासरी 1,500 लोकांना कोरोनाच्या संसर्गाची लागण होत होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, आज एका दिवसात कोरोना व्हायरसच्या 3,016 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी 2 ऑक्टोबर 2022 रोजी कोरोनाचे 3,375 रुग्ण आढळले होते. याशिवाय 1,396 रुग्ण कोरोमुक्त झाले आहेत. बुधवारी सक्रिय रुग्णांची संख्या 13,509 इतकी होती, जी आता 15,208 वर पोहोचली आहे.
कोरोनाचा वाढता धोका पाहता गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन नीती आयोगानं केलं आहे. तसेच सोशल डिस्टंसिग पाळा आणि शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, असं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात येत आहे.