दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मुंबई : छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुरा भागातील मंदिरात रामनवमीच्या पूर्वसंध्येला हिंसाचाराचा प्रकार घडला. रामनवमीची तयारी सुरू असताना दोन गटात वाद झाला.
त्यानंतर तेथे हिंसाचार घडला. यात एका नागरिकाचा मृत्य झाला आहे. तर अधिकाऱ्यांसह २० पोलीस कर्मचारी जखमी झाले. तसेच पोलिसांच्या वाहनांचीही जाळपोळ करण्यात आली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार कारावा लागला. अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. यानंतर संपूर्ण शहरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करावा लागला होता.
या हिंसाचाराच्या घटनेनंतर सत्ताधारी व विरोधकांकडून अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. दरम्यान, नामांतरानंतर छत्रपती संभाजीनगर शहरात दंगलसदृश्य घटना होण्याची माहिती देण्यात आली होती. त्याकडे मात्र राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तसेच मुस्लीम बहुल भागात असलेल्या या मंदिरात दिवसभर शांततेत कार्यक्रम पार पडले. त्यानंतर रात्रीच असे काय घडले की तेथे हिंसाचार घडला, असे प्रश्नही विरोधकांकडून उपस्थित केले जाऊ लागले आहेत. दरम्यान, या हिंसाचारावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
काँग्रेस नेते पटोले यांनी शहरात दंगल घडविण्यामागे सरकार आणि पोलिसांचा हात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. पटोले म्हणाले की, “शहरातील हिंसाचाराचा प्रकार हा जाणीवपूर्वक घडविलेला प्रयत्न होता. हे मंदीर मुस्लीम भागात आहे. तेथे रामनवमीनिमित्त दिवसभर कार्यक्रम सुरू होते. त्याला कुठलाही विरोध झाला नाही. मात्र रात्री बारा वाजता तेथे जाऊन काही घोषणा देण्यात आल्या. मुस्लीम धर्मियांना शिवगाळ कारण्यात आली. त्यातून जाणीवपूर्वक प्रकरण घडविण्यात आले. पोलिसांचा म्हणजेच सरकारचा त्याला अशिर्वाद होता.”
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर या सभेला परवानगी देताना पोलिसांनी काही अटी घातल्या आहेत. तत्पुर्वी राज्यात नियोजित सभा कोणत्याही स्थितीत होणार, असा निर्धार महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला होता. आता या सभेत महाविकास आघाडीचे नेते काय बोलणार, याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.