दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी-अनिल पाटणकर
पुणे : दक्षिण पुण्यातील
आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक , जांभूळवाडी,दत्तनगर यासह आंबेगाव पठार, शिव सृष्टी परिसरातील नागरिकांसाठी पुढील पंचवीस वर्षे नियमीत पाणी पुरवठा करणारा आणि पाण्याची चिंता कायमची संपुष्टात आणणारा महत्वकांक्षी प्रकल्प आगामी दिवाळीपर्यंत पुर्ण करुन तो कार्यान्वित करण्याचे आश्वासन प्रकल्प अधिकार्यांनी दिले असुन या परिसरातील पाणी प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे. लेक व्हिस्टा येथील तब्बल पंचेचाळीस लाख लिटर पाण्याच्या टाकीचे काम प्रगतीपथावर आहे.
पुणे महापालिकेच्या समान पाणी पुरवठा या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत महापालिकेत नव्याने सामाविष्ट झालेल्या आंबेगाव बुद्रुक आणि आंबेगाव खुर्दच्या विस्तरित भागाला पुढील पंचवीस वर्षांत वाढणारी लोकसंख्या विचारात घेऊन उभारल्या जाणाऱ्या पाण्याच्या टाक्यांच्या कामाची वाटचाल पूर्णत्वाकडे सुरू आहे. या कामाची पाहणी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे, माजी नगरसेविका स्मिता कोंढरे यांनी महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसह संयुक्तपणे नुकतीच केली आणि कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
माजी नगरसेविका स्मिता कोंढरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जांभूळवाडी रस्ता परिसरात मार्च २०२२ मध्ये पंचेचाळीस लाख लिटर साठवणूक क्षमतेच्या कामाचा शुभारंभ झाला. भौगोलिक दृष्ट्या अत्यंत उंच सखल भाग असल्याने सुरुवातीला काम संथगतीने होते. टाकीची उंचीही साधारण टाकी पेक्षा जास्त असल्याने एक वर्षाचा कालावधी उलटून गेला तरीही कामाला म्हणावी तशी गती येत नव्हती या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांच्या भेटीने कामाला गती मिळल्याचे संकेत आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना माजी नगरसेविका स्मिताताई कोंढरे म्हणाल्या “आंबेगाव खुर्द व बुद्रुक या भागातील सध्याच्या लोकसंख्येला आवश्यक पाणी पुरवठ्याची मोठ्या प्रमाणावर कमतरता भासत होती पाणी टंचाईच्या झळा सर्वसामान्य नागरिकांना सहन कराव्या लागत होत्या. वेळी अवेळी, कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. या सर्व गोष्टींचा विचार करून भविष्यातील वाढती लोकसंख्या गृहित धरून परिसरातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळावे यासाठी पंचेचाळीस लाख लिटर क्षमतेची टाकी बांधण्यात येत आहे.त्यामुळे नागरिकांना मुबलक आणि वेळेत पाणी पुरवठा होणार आहे.”
पुणे महापालिका पाणी पुरवठा विभागाचे अधिक्षक अभियंता नंदकिशोर जगताप यांनी सांगितले की, “पाण्याची साठवणूक क्षमता वाढल्याने नागरिकांना पुरेशा दाबाने आणि वेळेत पाणी पुरवठा होईल, पुढील सात महिन्यात टाकीचे काम पूर्ण होईल.”