दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
वाघोली ता.8 वडगाव शेरी – पथ विभागाच्या निष्काळजीपणामुळे नगर रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाल्याने जागोजागी अपघाताला निमंत्रण मिळत आहे. रस्ता पंधरा दिवस उखडून ठेवल्याने डांबरी रस्ता आणि कॉक्रिटचा रस्ता यांची पातळी वर- खाली झाली असून, त्यात वाहनाचे चाक जाऊन अपघात होत आहेत. त्यामुळे हे खड्डे ‘ मृत्यूचे सापळे ‘च ठरू लागले आहेत.
या रस्त्यावर टाटा गार्ड रूम ते विमाननगर चौकापर्यंत पावसाळी वाहिनी आणि जलवाहिनी टाकल्यानंतर त्याची खडी सर्वत्र पसरली आहे. सांडपाणी आणि पाणीपुरवठा या दोन्ही विभागांनी कामात निष्काळजीपणा केला आहे. कामानंतर संबंधितांकडून रस्ता पूर्वस्थितीत करून घेण्याची जबाबदारी पथ विभागाची असूनही, तिन्ही विभाग एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. त्यातच पथ विभागाने रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी सोमनाथ नगर, सोपान नगर परिसरातील रस्ता उघडून ठेवला आहे. मात्र पंधरा दिवसानंतरही डांबरीकरण केलेले नाही. त्यामुळे डांबरी रस्ता आणि सिमेंटचा रस्ता यांची पातळीवर वर- खाली होऊन अनेक जागी सुमारे सहा इंचाचे उभे खड्डे पडले आहेत. त्यात दुचाकीचे चाक जाऊन अनेकदा अपघात होत आहेत.
याबाबत स्थानिक नागरिकांनी सांगितले, पथ विभाग, पाणीपुरवठा विभाग आणि सांडपाणी वाहिनी विभाग एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. शेवटी हे तिन्ही विभाग महापालिकेचे आहेत. तिन्ही विभागांनी समन्वय ठेवून नगर रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करून घ्यावे. निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करावी.अशी मागणी समस्त नागरिकांनी केली.