दैनिक चालु वार्ता छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी: अन्वर कादरी
बार्टीच्या धर्तीवर सारथी संस्थेतील २०२१-२२ च्या निवड झालेल्या संशोधक विद्यार्थ्यांना पी.एच.डी. साठी देण्यात येत असलेली अधिछात्रवृत्ती (फेलोशिप) ही विद्यापीठाने दिलेल्या नोंदणीच्या दिनांकापासून देण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे.
०४ फेब्रुवारी २०२३ रोजी सहयाद्री अतिथी गृह येथे मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठा आरक्षण व सुविधा मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. त्यामध्ये मुख्यमंत्री व मुख्य सचिव यांना सारथी अधिछात्रवृत्ती ही नोंदणी दिनांकापासून देण्याबाबतच्या विद्यार्थ्यांच्या या मागणी संदर्भात अधिछात्रवृत्तीची माहिती घेवून प्रस्ताव सादर करण्याबाबत में निर्देश दिले.
त्यास अनुसरून सारथी संस्थेने महाराष्ट्र शासन नियोजन विभागास १४ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रस्ताव सादर केला. प्रचलित पध्दतीनुसार सारथी संशोधक विद्यार्थ्यांना पी.एच.डी. साठी अधिछात्रवृत्ती (फेलोशिप) देणेसाठी जाहिरातीद्वारे विद्यापीठाकडे नोंदणीकृत संशोधक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवणे, अर्ज पडताळणी, मूळ कागदपत्रांची पडताळणी, मुलाखत आणि शेवटी पात्र विद्यार्थ्याची यादी जाहीर करून, पात्र संशोधक विद्यार्थ्यांना अँवार्ड पत्र देणे अशी कार्यवाही केली जाते.
संशोधक विद्यार्थ्यांची विद्यापीठाकडे संशोधक म्हणून नोंदणी होण्याचा दिनांक व सदर संशोधक विद्यार्थ्यांना अॅवार्ड पत्र देण्याचा दिनांक यामधील प्रक्रियेला साधारणपणे १० ते ११ महिन्यांचा कालखंड जातो. सदर कालखंडाबाबत संशोधक विद्यार्थ्यांना प्रचलित कार्यपध्दतीनुसार अधिछात्रवृत्ती दिली जात नाही.
बार्टीच्याच धर्तीवर सारथी संशोधक विद्यार्थ्यांना पी.एच.डी. फेलोशिप हि नोंदणी दिनांकापासून देण्याबाबत सारथीच्या संशोधक विद्यार्थ्यांची मागणी असून शासनास सादर झालेल्या प्रस्तावावर सकारात्मक कार्यवाही होऊन संशोधक विद्यार्थ्यांना त्वरीत न्याय देण्यात यावा अशी मागणी दानवे यांनी केली आहे